११९३ शाळा प्रगत !

By Admin | Updated: April 18, 2016 00:54 IST2016-04-18T00:50:04+5:302016-04-18T00:54:16+5:30

उस्मानाबाद : शासनाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, हा यामागचा उद्देश.

11 9 3 School Advanced! | ११९३ शाळा प्रगत !

११९३ शाळा प्रगत !


उस्मानाबाद : शासनाच्या वतीने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये, हा यामागचा उद्देश. त्यानुसार जिल्हाभरातील सर्व माध्यम व व्यवस्थापनाच्या मिळून सुमारे १ हजार १९३ शाळा प्रगत झाल्या आहेत. सदरील शाळांची माहिती संकेतस्थळावर भरण्यात आली आहे. यामध्ये जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
२२ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शाळा प्रगत आहे की नाही, हे निश्चित करण्यासाठी तब्बल निकष देण्यात आले आहेत. यामध्या प्रामुख्याने पट, वर्षाची सरासरी उपस्थिती, शाळाबाह्य बालके, प्रत्यक्ष प्रवेशित बालके, शाळा परिसर, बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणकार, चित्र वाचन, वाक्यांचे वाचन, शब्द तयार करणे, तीन शब्दांपासून वाक्य बनविणे, सोप्या शब्दांपासून गोष्ट तयार करणे, घड्यारातील काटे पाहून अचूक वेळ सांगणे, तीन शब्दांपासून चार ओळींची कविता तयार करणे आदी २५ बाबींचा समावेश आहे. या प्रत्येक बाबीसाठी पाच गुण निर्धारित केले आहेत. या निकषांच्या आधारांवर ८० गुण मिळाल्यास तसेच संकलित दोनच्या चाचणीमध्ये प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने ४० टक्के गुण प्राप्त केल्यास संबंधित शाळेस प्रगत शाळा म्हणून घोषित करण्यात येते. जिल्हाभरात सर्व माध्यम आणि व्यवस्थापनाच्या मिळून सुमारे १ हजार ७४१ एवढ्या शाळा आहेत. आजवर यापैकी तब्बल १ हजार १९३ शाळांनी ‘प्रगत’ झाल्याचा दावा केला आहे. तशी शाळानिहाय माहिती शासनाच्या संकेतस्थळावर टाकली आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानावर असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
जिल्हाभरात सुमारे १ हजार ७४१ एवढ्या शाळा आहेत. या सर्व शाळांनी उपरोक्त उपक्रमांतर्गत माहिती शासनाच्या संकेतस्थळावर टाकणे अपेक्षित आहे. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडून सातत्याने पत्रव्यवहारही करण्यात येत आहे. असे असतानाही जिल्हाभरातील सर्व माध्यम आणि सर्व व्यवस्थापनाच्या मिळून सुमारे साडेपाचशेवर शाळांकडून अद्याप संकेतस्थळावर माहिती टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित शाळा प्रगत होणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केल्या जावू लागला आहे.
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर नजर टाकल्यानंतर चिंताजनक चित्र समोर येते. काही शाळांनी गुणवत्ता उंचावली असली तरी इतर शाळांच्या बाबतीत अत्यंत विदारक स्थिती आहे. चौथीच्या वर्गातील एकेका विद्यार्थ्याला साधी बेरीज, वजाबाकीही येत नाही. हा अनुभव लोकप्रतिनिधींसह काही अधिकाऱ्यांनीही शाळा भेटीवेळी घेतलेला आहे. असे असतानाच सुमारे अकराशेवर शाळांनी आमच्याकडे एकही विद्यार्थी अप्रगत राहिलेला नाही, असा दावा करून माहितीही संकेतस्थळावर भरली आहे. त्यामुळे ही माहिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती पडताळून पहाण्याची गरज शिक्षणप्रेमींतून व्यक्त केली जात आहे.

Web Title: 11 9 3 School Advanced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.