१०२ प्रकल्पांत १.३० टक्केच पाणीसाठा !

By Admin | Updated: December 9, 2015 00:41 IST2015-12-09T00:39:35+5:302015-12-09T00:41:03+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्याचे अपेक्षित पर्जन्यमान ७७०.०७ मिमी एवढे असले तरी अख्ख्या पावसाळ्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही.

102 percent water supply to 1.30 percent! | १०२ प्रकल्पांत १.३० टक्केच पाणीसाठा !

१०२ प्रकल्पांत १.३० टक्केच पाणीसाठा !


उस्मानाबाद : जिल्ह्याचे अपेक्षित पर्जन्यमान ७७०.०७ मिमी एवढे असले तरी अख्ख्या पावसाळ्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही. मागील तीन ते चार वर्षापासून अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सध्या प्रकल्पातील जलसाठाही चिंतेत टाकणारा आहे. १०२ प्रकल्पामध्ये अवघा १.३० टक्के एवढा अत्यल्प पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे एक मोठा, दोन मध्यम आणि २२ लघुप्रकल्पात ठणठणाट निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पाअंतर्गत येणारी गावे आणि शहरांना सध्या भीषण जलसंकटाचा सामना करावा लागत आहे.
जिल्ह्यात मागील चार वर्षापासून सरासरीच्या अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. ३ डिसेंबर २०१५ अखेर उस्मानाबाद तालुक्यात ३९७ मिमी, तुळजापूर ३९३.६, उमरगा ४१०.६, लोहारा ४३६.७, कळंब ३३५.५, भूम ३२२.८, वाशी ३६४ आणि परंडा तालुक्यात अवघा ३२९.४ मिमी पाऊस झाला आहे. आठ तालुक्यातील पर्जन्याची सरासरी विचारात घेतली असता अवघा ३७३.७ मिमी एवढा पाऊस पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या दुष्काळी निर्माण झाली आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. जनावरांनाही पाण्यासाठी कोसोदूर भटकंती करावी लागत आहे. अत्यल्प पर्जन्यमानामुळे प्रकल्पातील पाणीसाठाही अपेक्षित प्रमाणात वाढला नाही. परिणामी आजघडीला बहुतांश प्रकल्पाच्या घशाला कोरड पडली आहे. उस्मानाबाद विभागाअंतर्गत मध्यम, लघु आणि मोठे असे मिळून १०२ प्रकल्प येतात. या प्रकल्पांची साठवण क्षमता ३७०.३४८ दलघमी एवढी असली तरी प्रत्यक्षात आज अवघा ४.८०४ दलघमी इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. उपयुक्त साठ्याची टक्केवारी केवळ १.३० एवढी आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत यावेळी मोठ्या प्रमाणात पाणीसाठ्यात घट झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत उपरोक्त सर्व प्रकल्पात मिळून ७२.१९ दलघमी एवढा उपयुक्त साठा होता. त्याचे प्रमाण १९.४९ टक्के एवढे होते.
उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा, रुई. कळंब तालुक्यातील रायगव्हाण, भूम तालुक्यातील बाणगंगा, रामगंगा, परंडा तालुक्यातील खासापुरी, चांदणी, खंडेश्वर, साकत या मध्यम प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो. यापैकी अवघ्या बाणगंगा प्रकल्पामध्येच ०.५१४ दलघमी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.
उर्वरित प्रकल्पामध्ये उपयुक्त साठा उरलेला नाही. त्यामुळे पाण्यासाठी या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. अशीच अवस्था लघुप्रकल्पांच्या बाबतीत पहावयास मिळते.६८ प्रकल्पात मिळून ४.२९० दलघमी एवढा उपयुक्त साठा आहे. मागील वर्षी याच प्रकल्पात ३७.८०१ दलघमी एवढा साठा उपलब्ध होता. दिवसागणिक प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. काही शहरामध्ये आजघडीला ६ ते ८ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भविष्यात हे चित्र अधिक गंभीर बनणार आहे.

Web Title: 102 percent water supply to 1.30 percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.