घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : १९५६ साली त्या गावाचे पूनर्वसन झाले. आणि एक नवीन गाव उदयास आले. अगदी तेव्हापासून ते गाव फ्लोराइडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवत आहे. एक वर्षापूर्वी तिथे वॉटर एटीएमचे काम करण्यात आले असले तरी अजून हे एटीएम सुरू झालेच नाही.नवानगर हे त्या गावाचे नाव असून नागभीड तालुक्यातील बोंड या ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. १९५६ साली ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा या गावचे या ठिकाणी पूनर्वसन करण्यात आले आणि नवानगर हे गाव उदयास आले. पूनर्वसन करण्यात आले. त्यावेळी ३१ कुटुंबांना वनविभागाने घरे आणि शेतीसाठी जागा उपलब्ध करून दिली. आता गावाचा विस्तार बराच झाला आहे. आणि गावाची लोकसंख्याही चारशेवर पोचली आहे. मात्र हे गाव पूर्णपणे जंगलात वसले असल्याने गावात जे काही पाण्याचे स्रोत्र आहेत, ते पूर्णपणे फ्लोराईडयुक्त आहेत. परिणामी गावातील अनेक लोक या पाण्याच्या आजाराचे बळी ठरले आहेत. दात पिवळी पडणे, ते वेडीवाकडी होणे, हातपाय दुखणे, सांधेदुखीचा त्रास या आजारांचा यात समावेश आहे. प्रारंभी लोकांना पुरेसे ज्ञान नव्हते. त्यामुळे त्यांनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले. पण जेव्हा या पाण्याच्या दुष्परिणामाविषयी लोकांना कळू लागले, तेव्हा या पाण्यापासून आमची मुक्तता करा, अशी एकमुखी ते मागणी करू लागले. २००५ पासून तर ते या मागणीचा पाठपुरावा करीत आहेत. पण एकाही अधिकाऱ्याने या मागणीचा व समस्येचा अनेक वर्ष गांभीर्याने विचार केला नाही. मात्र गावकऱ्यांनी हार पत्करली नाही. त्यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. आणि अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आहे. या गावात शुद्ध पाण्याचे वॉटर एटीएम मंजूर करण्यात आले. वर्षभरापूर्वीच वॉटर एटीएम लावण्यातही आले. मात्र वर्षभराचा कालावधी झाला असला तरी हे वॉटर एटीएम सुरू झालेच नाही. परिणामी नागरिकांना फ्लोराईडयुक्त पाण्यावरच आपली तहान भागवावी लागत आहे.
६५ वर्षापासून फ्लोराईडयुक्त पाण्यावरच तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 6:00 AM