शुल्क न भरल्याने ऑनलाईन शिक्षण बंद केले; पालक संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 05:01 IST2020-08-21T05:00:00+5:302020-08-21T05:01:02+5:30
या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण त्वरित सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी विद्यालयाच्या परिसरात भद्रावती, उर्जानगर, वेकोलि, पडोली येथील जवळपास २०० ते २५० पालक जमा झाले होते. व्यवस्थापनाची नकारात्मक भूमिका लक्षात घेवून पालकवर्गाने थेट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण विभागाला निर्देश दिले.

शुल्क न भरल्याने ऑनलाईन शिक्षण बंद केले; पालक संतप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना काळातील मागील चार महिन्यांपासून ज्या विद्यार्थ्यांनी शाळेचे शुल्क भरले नाही, त्या सर्व विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण बंद केल्याचा प्रकार येथील नारायणा विद्यालयात घडला. यामुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण त्वरित सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी विद्यालयाच्या परिसरात भद्रावती, उर्जानगर, वेकोलि, पडोली येथील जवळपास २०० ते २५० पालक जमा झाले होते. व्यवस्थापनाची नकारात्मक भूमिका लक्षात घेवून पालकवर्गाने थेट पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. पालकमंत्री वडेट्टीवार यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण विभागाला निर्देश दिले. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विशाल देशमुख व शिक्षण विभागाचे अधिकारी काकडे, गादेवार यांनी शाळेला भेट देवून शाळा व्यवस्थापनासोबत चर्चा करून त्वरित ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात सांगितले. व्यवस्थापनाने १२ तासांचा अवधी मागितला. परंतु काही तासांतच ऑनलाईन शिक्षणाची लिंक सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. जवळपास ६०० विद्यार्थ्यांचे आॅनलाईन शिक्षण बंद करण्यात आले होते.
कोरोनाच्या काळात कुठल्याही विद्यर्थ्यांकडून शुल्कासाठी सक्ती करू नये, असे शासनाचे आदेश असतानासुद्धा या विद्यालयातर्फे विद्यार्थ्यांना शुल्कासाठी तकादा लावण्यात आला होता. काही पालकांनी याबाबत विद्यालयाला निवेदन दिले. परंतु १५ दिवसांपेक्षा जास्त काळ लोटूनही विद्यालयाने या निवदेनाची कुठलीही दखल न घेता थेट कारवाई सुरू केली. परंतु शेवटी पालकमंत्री व शिक्षण विभागाच्या दणक्याने व्यवस्थापनाद्वारे काही अवधीतच ऑनलाईन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले. या प्रकारामुळे पालकांना मानसिक त्रास झाला. मात्र आता शिक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.