परझडीवासी मूलभूत सोयींपासून वंचित

By Admin | Updated: May 15, 2014 23:23 IST2014-05-15T23:23:56+5:302014-05-15T23:23:56+5:30

मारोडा : येथून नऊ किलोमिटरवर सोमनाथच्या जंगलाच्या कुशीत वसलेले बफरझोनमधील परझडी हे १५0 लोकवस्तीचे गाव अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधापासून वंचित आहे.

Parshhadias are deprived of basic amenities | परझडीवासी मूलभूत सोयींपासून वंचित

परझडीवासी मूलभूत सोयींपासून वंचित

मारोडा : येथून नऊ किलोमिटरवर सोमनाथच्या जंगलाच्या कुशीत वसलेले बफरझोनमधील परझडी हे १५0 लोकवस्तीचे गाव अनेक वर्षांपासून मूलभूत सोयीसुविधापासून वंचित आहे. गावाला जोडणारा रस्ता, प्राथमिक शाळा, पिण्याचे पाणी आणि रोजगाराच्या संधीचा अभाव लवकर दूर करण्यात यावा, अशी गावकर्‍यांची मागणी आहे.

मूल तालुक्यापासून मारोडा - भाकर्णीवरून परझडीकडे जाणारा मार्ग नेहमी चर्चेचा विषय ठरतो. या रस्त्याचा अद्यापपर्यंत विकास झालेला नाही. हा चार किलोमिटरचा रस्ता पूर्णत: उखडून गेलेला आहे. यापैकी एक किमी अंतर तर नलेश्‍वर नहराच्या कालव्यावरून जावे लागते. त्याचे बांधकाम अत्यंत धिम्यागतीने सुरू आहे. त्यामुळे येथील नागरिक जंगलातून सोमनाथ प्रकल्पाकडे जाणार्‍या नलेश्‍वरच्या नहरानेच ये-जा करतात. त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी करण्यात यावे, अशी मागणी आहे.

या गावात ३0 ते ३५ कुटुंबे वास्तव्याला आहेत. गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. या घटनेला चार ते पाच वर्षे झालीत. नळाचे पाणी पिण्यासाठी मिळणार म्हणून लोकांनी खासगी नळाचे कनेक्शन जोडले. दुर्दैवाने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या टाकीत पाणी कधीच पोहचले नाही.

गावात एक विहीर व एक बोअरवेल आहे. उन्हाळ्यात ही विहीर आटते अन् पावसाळ्यात बाहेरील झर्‍यामुळे अशुद्ध पाणी तयार होते. सुक्ष्म जंतू पाण्यात आढळतात. त्यामुळे शुद्ध पाणी मिळत नाही. दुसरा पर्याय बोअरवेलचा आहे. ३0 ते ३५ कुटुंबांना एकाचवेळी पाणी भरण्यास असुविधा तयार होते. एकच बोअरवेल ते सुद्धा गावाच्या एका बाजुला असल्यामुळे एक घागर पाण्यासाठी अर्धा-अर्धा तास महिलांना ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे महिलांना शेतकामावर जायला उशिर होतो.

बालकांना शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियम मंजूर झालेला आहे. एक किलोमिटरपर्यंत येथे शाळा नाही. त्यामुळे अंगणवाडीनंतर किमान पूर्व प्राथमिक शिक्षणापासून येथील विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

येथील काही विद्यार्थी नातेवाईकांकडे किंवा दूरच्या आश्रमशाळेत शिकायला जातात. ही मुले सणासुदीला घरी आलीत की १५,१५ दिवस शाळेत परत जात नाहीत. याशिवाय काही विद्यार्थी मारोडा येथे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शिकतात. त्यांची संख्या फार कमी असते. म्हणून प्राथमिक शिक्षणाची दुव्यवस्था थांबवायची असेल तर किमान वस्तीशाळा तरी शासनाने निर्माण करावी अशी पालकांची मागणी आहे.

या खेड्यावरच्या लोकांना शेतात काम केल्याशिवाय रोजगार मिळत नाही. कधी शहरात लाकडाची मोळी विकून पोट भरणारी माणसं बफर झोनमुळे निर्बंधात आली आहेत. एप्रिल महिन्यात मोहाफुले व मे महिन्यात तेंदुपत्त्याच्या रोजगाराशिवाय येथील महिला-पुरुषांना उत्पन्नाचे साधन नाही. अशा या परझडीवासीयांच्या मूलभूत प्रश्नांना कोण वाचा फोडणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Parshhadias are deprived of basic amenities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.