सचिन सरपटवार। लोकमत न्यूज नेटवर्क भद्रावती : दिवस सोमवार, वेळ दुपारी १.३० मिनिट. विद्युत खांबावर शॉर्टसर्किट झाले. गवतावर ठिणगी पडली. ठिणगीने रौद्ररूप धारण केले आणि सर्व होत्याचे नव्हते झाले. रान तळोधीतील ३५ घरे या आगीने आपल्या कवेत घेतली. एकीकडे सूर्य कोपला होता अन् दुसरीकडे आगीचे भयंकर रूप होते. लहानग्यांचा टाहो होता. मोठ्यांची मदतीची हाक होती अन् जनावरांचे हंबरणे होते. दुपारी १.३० ते सायंकाळी ५.३० च्या दरम्यान ३५ कुटुंबे बेघर झाली. काही बकऱ्या मरण पावल्या. दोन वासरे जखमी झाली. हिरवागार परिसर काळाकुट्ट झाला. त्यातच सर्वत्र पसरली होती ती राख. सर्व काही डोळ्यासमोर घडले पण दैवासमोर काहीच चालले नाही. रानतळोधी वासीयांच्या आयुष्यातील हे चारतास अंगावर शहारे निर्माण करणारे होते. अंदाजे ४५ ते ५० लाखांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोर झोनमधील रानतळोधी येथे २०१० मध्ये आग लागून अनेक घरे भस्मसात झाली होती. सोमवारच्या आगीत भांडे, कपडे, रक्कम सर्वच गेले. एकाएकी बेघर झाले. तहसील कार्यालय भद्रावतीतर्फे सकाळच्या जेवणाची सोय करण्यात आली. रात्री व उद्याच्या जेवणाची सोय स्वस्त धान्य दुकानदार, रानतळोधीातर्फे करण्यात आली. आज महसुुल विभागातर्फे घरांचा पंचनामा करण्यात आला. ३५ घरे पूर्णत: तर चार घरे अंशत: अशा ३९ घरांचा पंचनामा करण्यात आला. निराधार झालेल्या ३५ कुटुंबांनी अंगणवाडी शाळा, समाज भवन तर कोणी गावातल्या नातेवाईकाकडे आश्रय घेतला. भद्रावती न.प. मूल न.प. सिटीपीएस येथील अग्नीशमन दलातर्फे आग नियंत्रणात आणण्यात यश मिळविले. भद्रावतीचे तहसिलदार सचिन कुमावत, नायब तहसिलदार आर. काळे, महसुल विभागाचे कर्मचारी धनराज पारसे, निलेश देठे, भागवत नाईकवाडे, मून, सुरेश डाखरे, अतुल खापने, वामन कोपलकवार, ठाणेदार विलास निकम, वनविभागाचे अधिकारी एसडिपीओ, एसडिओ, हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. अनुदान देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अवघ्या चार तासात ‘ते’ झाले बेघर
By admin | Updated: May 24, 2017 02:16 IST