ई-लर्निंग शाळेतून घडविला आदर्श
By Admin | Updated: December 30, 2016 01:28 IST2016-12-30T01:28:15+5:302016-12-30T01:28:15+5:30
बल्लारपूर तालुक्यातील जुनी दहेली या गावातील जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ८ वर्ग पर्यंतची १५० विद्यार्थी असलेल्या शाळेने एक आदर्श निर्माण केला आहे.

ई-लर्निंग शाळेतून घडविला आदर्श
गावकऱ्यांचे सहकार्य : दहेलीची जिल्हा परिषद शाळा
वसंत खेडेकर बल्लारपूर
बल्लारपूर तालुक्यातील जुनी दहेली या गावातील जिल्हा परिषदेची वर्ग १ ते ८ वर्ग पर्यंतची १५० विद्यार्थी असलेल्या शाळेने एक आदर्श निर्माण केला आहे. येथील पहिला वर्ग वगळता बाकी सर्व वर्गामध्ये ई-लर्निंगची व्यवस्था, संगणक, विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती आवड निर्माण व्हावी, शाळेत त्यांचे मन रमावे व जुळावे अशा पद्धतीची शिक्षकांची कार्यप्रणाली, मध्यान्ह भोजनाची शिस्त अतिशय कौतुकास्पद आहे. हे सर्व पाहून शाळा परिवार, शिक्षण व शिक्षक असेच असावेत, असे आपुसक शब्द निघत असून विद्यार्थी व शिक्षकांनी एक नवा आदर्शच घडवून दिला आहे.
शिस्त आणि आदर्शमय वातावरण केवळ या शाळेपुरतेच मर्यादित नाही तर गावकऱ्यांमध्ये पाल्यांच्या शिक्षणाबाबत आवड निर्माण होऊन या शाळेच्या सर्वांगीण विकासार्थ गावकरीही आवडीने पुढे आले आहेत. चांगले शिक्षण व शिस्त याबाबत सकारात्मक भावना शिक्षकंसोबतच गावकऱ्यांच्याही मनात निर्माण झाली की कसे आदर्शवत घडून येते, हे जुनी दहेलीतील या शाळेत बघायला मिळते.
प्रत्यक्ष भेट दिली असता, गावकऱ्यांनी मनात आणले तर कसा चांगला बदल घडून येऊ शकतो, हे बघायला मिळाले. प्रस्तुत प्रतिनिधी शाळेत पोहचला त्या समयी मध्यान्ह भोजनाची वेळ झाली होती. सूचक घंटा वाजल्यानंतर विद्यार्थी रांगेने व शिस्तबद्ध वर्गातून बाहेर निघाले. हात धुवून चटईवर बसलेत. मसाला भात वाढलेले ताट त्यांचे पुढे आल्यानंतर सर्वांनी सामुदायिक प्रार्थना (श्लोक) केली. नंतर जेवायला सुरुवात !
हे सारे बघून असेच सर्वत्र साऱ्या शाळांमध्ये झाले तर? असा प्रश्न मनाला स्पर्शून गेला. मुख्याध्यापकपदी सुरेश गिलोरकर हे येथे बदलून आल्यानंतर या शाळेची स्थिती बदलविण्याकरिता गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्याकडून मिळालेल्या आर्थिक सहयोगाने संगणकांची दुरुस्ती केली. पुढे ई लर्निंग शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन लोक सहभागातून प्रत्येक वर्गात ई लर्निंग शिक्षणाची सोय केली. विद्यार्थी संगणक हाताळतात. स्वत: माऊस हातात घेऊन ई लर्निंगच्या माध्यमातून माहिती मिळवतात. या शाळेतील विद्यार्थी आधुनिक शिक्षणप्रणाली व तंत्रज्ञानाची असे जुळले गेले आहेत.
बल्लारपूर येथील डॉ. अनिल वाढई (संचालक चंजिम बँक) यांचे हे जन्मगाव असून त्यांचे व शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश मोहितकर यांचे शाळेच्या सकारात्मक बदलात मोठे सहकार्य लाभत आले आहे, असे शिक्षक सांगतात. परिसर वृक्ष फुलांनी फुलविला असून विद्यार्थी व्यसनापासून दूर आहेत.
भजन कार्यक्रमातून मदत निधी गोळा
शाळेच्या मदत निधी संकलनाकरिता गावात एखादा स्टेज कार्यक्रम करण्याचे ठरले. काहींचे मत नाटकाचा प्रयोग करावा असे होते. पण, नाटकातून केवळ मनोरंजनच होईल. लोकांचे प्रबोधन व्हावे, या विचारातून भजन स्पर्धा घेण्याचे पक्के झाले आणि या भजन स्पर्धेतून बरीच मोठी निधी तर उभी झालीच, राष्ट्रसंताचे ग्रामविकासाचे विचारही लोकांपर्यंत पोहचले.