निधी मिळाला, मात्र विद्यार्थ्यांना गणवेश नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 05:00 IST2022-01-03T05:00:00+5:302022-01-03T05:00:42+5:30
शाळांतील समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते यापूर्वी विविध राष्ट्रीयकृत बँकेत होते. यातून सर्व व्यवहार केले जात होते. या खात्यातील सर्व निधी जिल्हा परिषदेने परत घेऊन महाराष्ट्र बँकेत नवीन खाते काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षकांनी धावपळ करीत महाराष्ट्र बँकेत खाते काढले. मात्र, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाचा निधी पुन्हा जुन्याच खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्यामुळे सध्या शिक्षक संभ्रमात पडले आहेत.

निधी मिळाला, मात्र विद्यार्थ्यांना गणवेश नाही
साईनाथ कुचनकार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आठव्या वर्गापर्यंतच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून मोफत गणवेश दिला जातो. कोरोना संकटातही राज्य शासनाने जिल्ह्यासाठी २ कोटी ५४ लाख ६८ हजार रुपयांचा निधी शिक्षण विभागाकडे पाठविला. मात्र, शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार मुख्याध्यापकांनी शाळांचे जुने बँक खाते यापूर्वीच बंद केले आहे. नवीन बँक खात्यात निधी जमा करण्यास शिक्षण विभाग नकार देत असल्याने निधी असतानाही शिक्षण विभागाचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांना गणवेशाविना राहण्याची वेळ आली आहे. त्यातच गणराज्य दिनही गणवेशाविनाच जाणार की, काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शाळांतील समग्र शिक्षा अभियानाचे बँक खाते यापूर्वी विविध राष्ट्रीयकृत बँकेत होते. यातून सर्व व्यवहार केले जात होते. या खात्यातील सर्व निधी जिल्हा परिषदेने परत घेऊन महाराष्ट्र बँकेत नवीन खाते काढण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शिक्षकांनी धावपळ करीत महाराष्ट्र बँकेत खाते काढले. मात्र, विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या गणवेशाचा निधी पुन्हा जुन्याच खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. त्यामुळे सध्या शिक्षक संभ्रमात पडले आहेत.
शाळांचे खाते बंद झाले असतानाही पुन्हा सुरू कसे होणार हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. दरम्यान, बँकांना विनंती करून जुनेच खाते सुरु करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने शाळांना कळविले आहे. मात्र एकदा बंद झालेले बँक खाते पुन्हा कसे सुरु होणार, हा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. यामध्ये मात्र विद्यार्थी गणवेशाविनाच शाळेत जात आहेत.
या विद्यार्थ्यांना मिळतो गणवेश
- १ ते ८ वर्गातील सर्व मुलींना तसेच अनुसूचित जाती जमातीतील मुले, दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले यांना दरवषी शासनाकडून दोन गणवेश मोफत दिले जाते. कोरोना संकटामुळे मागील वर्षी एक तसेच यावर्षीही एकाच गणवेशाचा निधी पंचायत समितीपर्यंत पाेहचला आहे.
२ कोटी ५४ लाख मिळाला निधी
- विद्यार्थ्यांना गणवेशासाठी राज्य शासनाने २ कोटी ५४ लाख ६८ हजार रुपयांची निधी पाठविला आहे. यातून प्रत्येक विद्यार्थ्यांना ३०० रुपयांचा गणवेश मिळणार आहे.
शाळांचे विविध बँकेत असलेले सर्व शिक्षा अभियानांतर्गत खाते शून्य शिल्लक करून नवीन समग्र शिक्षा खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये काढण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. समग्र शिक्षा नवीन खाते काढल्याने शून्य शिल्लक खाते शाळांनी बंद केले. आता परत जुने खाते सुरू करायचे असेल तर प्रशासनाने बँकेशी थेट पत्रव्यवहार करावा. जुने बँक खाते पुन्हा सुरू करण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे.
-प्रकाश चुनारकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक)