लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याला मिळणारा ७६ कोटी ३ लाख रुपयांचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. निधी मिळण्यात झालेल्या विलंबामुळे काही कामे रखडली असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाणीटंचाईचा धोका वाढला आहे.
जलजीवन मिशन योजनेसाठी केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी ५० टक्के आर्थिक सहभाग दिला जातो. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यासाठी केंद्र सरकारकडून ५७ कोटी २३ लाख रुपये, तर राज्य सरकारकडून १८ कोटी ८० लाख रुपये असा एकूण ७६ कोटी ३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा निधी अद्याप जिल्ह्याला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अनेक गावांतील सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची कामे आर्थिक अडचणीमुळे अर्धवट अवस्थेत आहेत. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले. ग्रामीण भागात पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते.
अशा परिस्थितीत निधीअभावी कामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद प्रशासनानेही या परिस्थितीची गंभीर दखल घेतली. प्रलंबित निधी तत्काळ मिळावा, यासाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी उपाययोजना
संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. विभागाचे कार्यकारी अभियंता सुमित बेलपत्रे यांनी अनेक अपूर्ण कामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला असून, संबंधित गावांत पर्यायी उपाययोजनाही केल्या आहेत.
"निधीसाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरूच आहे. संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची अडचणच भासू नये, यादृष्टीने विविध प्रभावी उपाययोजना करण्यात आल्या."- सुमित बेलपत्रे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा, जि.प. चंद्रपूर
Web Summary : Chandrapur's जलजीवन Mission faces setbacks as ₹76 crore in funds are delayed, hindering water supply projects. This threatens water scarcity in rural areas during the summer. Despite the delay, efforts are underway to mitigate potential water shortages.
Web Summary : चंद्रपुर में जलजीवन मिशन के लिए ७६ करोड़ रुपये का फंड अटका हुआ है, जिससे जलापूर्ति योजनाओं में बाधा आ रही है। गर्मी में ग्रामीण क्षेत्रों में पानी की कमी का खतरा बढ़ गया है। धन के अभाव के बावजूद, जल संकट को कम करने के प्रयास जारी हैं।