सोयाबीनच्या अल्प दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:48+5:30
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या पावसाने तुरीला चांगला उतारा दिला होता. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. मात्र तुरीची विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ शेतकऱ्यांना तापदायक ठरली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र कमी करून सोयाबीनला प्राधान्य देण्यात आले.

सोयाबीनच्या अल्प दरामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आता पावसाने विश्रांती घेतली असून सोयाबीनच्या मळणीला वेग आला आहे. ढगाळी वातावरण कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये भिती आहे. या पावसामुळे सोयाबीनलाही योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना नेहमीच त्रास सहन करावा लागतो. मागील वर्षी झालेल्या पावसाने तुरीला चांगला उतारा दिला होता. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. मात्र तुरीची विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ शेतकऱ्यांना तापदायक ठरली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीचे क्षेत्र कमी करून सोयाबीनला प्राधान्य देण्यात आले. मध्यंतरी झालेल्या पावसाने सोयाबीनला फटका बसला होता. ऐन काढणीच्या अवस्थेत परतीच्या पावसाने सोयाबीनचा दर्जा घसरविला. भिजलेल्या सोयाबीनला संरक्षण देण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. आता भिजलेले सोयाबीन वाळवून ते विक्रीसाठी तयार केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुप्पट मजुरीसाठी पदरमोड करावी लागत आहे. सद्या व्यापाऱ्याकडून दोन हजार २०० रुपये ते तीन हजार रुपये दर दिल्या जात आहे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट केली जात असून विविध कारणे सांगून कवडीमोल भावात खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
खुल्या बाजारात सोयाबीनच्या दरात घट
जिल्ह्यात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत आहे. सद्यस्थितीत बाजारपेठेत अडीच ते तीन हजार रुपये दर मिळत आहे. परतीच्या पावसात भिजल्याने सोयाबीनमध्ये असलेल्या ओलाव्याने दर कमी झाल्याचे कारण सांगितले जात असून त्यापेक्षाही कमी दरात खरेदी सुरू आहे. शिवाय वजनातही घट होत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत काही व्यापारीही भाव पाडून शेतकऱ्याची पिळवणूक करीत आहे.