पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतातुर
By Admin | Updated: June 30, 2015 01:47 IST2015-06-30T01:47:39+5:302015-06-30T01:47:39+5:30
यावर्षी पुन्हा वरूणराजा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देणार की काय, असे वाटायला लागले आहे. मागील दोन वर्ष सतत

पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंतातुर
चंद्रपूर : यावर्षी पुन्हा वरूणराजा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू देणार की काय, असे वाटायला लागले आहे. मागील दोन वर्ष सतत नुकसानीला सामोरे जाणारा शेतकरी यावेळी खरीप हंगामाकडून मोठी आशा बाळगून आहे. मान्सूनचे आगमन होताच प्रारंभी तीन दिवस संततधार स्वरुपात बरसणारा पाऊस या आठवडाभर गायब राहिला. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या आहेत. मात्र हवामान खात्याने जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाचे योग नाही, असा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे. आणखी काही दिवस पावसाने दडी मारली तर शेतकऱ्यांना यावर्षीदेखील दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.
खरीप हंगामाला काही दिवसांपूर्वी खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. शेतकऱ्यांनी हंगामपूर्व मशागतीची कामे करीत असतानाच बि-बियाणांची जुळवाजुळव करणे सुरू केले होते. गेल्या दोन वर्षात नुकसानीला सामोरे जाऊन शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. मात्र शेतकरी अद्यापही खचलेला नसून नव्या जोमाने तयारीला लागल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. यावर्षी तरी निसर्ग आपल्याला साथ देईल, अशी आस शेतकरी बाळगून आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेकांना दुबार पेरणी करावी लागली होती. दुबार पेरणी करताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा पाऊस गायब झाला. पावसाचा हा लहरीपणा सातत्याने कायम राहिला. मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना पाहिजे तसे उत्पन्न मिळू शकले नाही. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही.
विशेष म्हणजे, २०१३ आणि २०१४ असे सातत्याने दोन वर्ष शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. २०१३ मध्ये तर खरिपात शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. २०१४ मध्ये थोडेफार उत्पन्न झाले. मात्र नुकसान टळू शकले नाही.
यावर्षीच्या खरीप हंगामात १५४० लाख क्विंटल सरासरी उत्पन्न होण्याची आशा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली असल्याने शेतकऱ्यांत आनंद आहे. मात्र गतवर्षीच पावसाने दगा दिल्याने यावर्षी तरी हवामान खात्याचा अंदाज खरे ठरेल का, अशी चर्चा शेतकऱ्यांत आहे. दरम्यान, जून पहिल्या पंधरवाड्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात एकदोन वेळा पाऊस बरसला. मात्र या पावसाने जमीन ओली होऊ शकली नाही. त्यानंतर मान्सूनचे धडाक्यात आगमन झाले. तीन दिवस सतत संततधार पाऊस बरसला. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पात, नदी-नाल्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी जमा झाले. एवढेच नव्हेतर शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी जमा झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी विलंब झाला. त्यानंतर मात्र पावसाने उघाड दिला. जमीन वाळल्यानंतर जिल्ह्यात पेरण्यांची लगबग सुरू झाली. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी महागडे बि-बियाणे घेऊन शेतात पेरले. मात्र त्यानंतर पाऊसच आला नाही. आता शेतकऱ्यांना पावसाची गरज आहे. मात्र पावसाने मागील आठ-दहा दिवसांपासून दडी मारली आहे. पुढे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पावसाची चिन्ह नाहीत, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. (शहर प्रतिनिधी)
आधी बियाणे घेणाऱ्या शेतकऱ्यांना फटका
वरोरा : या हंगामात मान्सून वेळेवर येणार असे भाकित हंगामाच्या दोन ते तीन महिन्यापूर्वीच करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या वेळी बियाणाची टंचाई भासणार नाही. यासाठी कापसाच्या बियाणाची खरेदी केली. त्यानंतर शासनाने ९ जूनपासून ज्या शेतकऱ्यांनी कापूस बियाणे घेतले, त्यांना प्रति पाकीट १०० रुपयाची सुट दिली. त्यामुळे ९ जूनपूर्वी राज्यातील ४० टक्के शेतकऱ्यांनी कापूस बियाणाची खरेदी केली. त्यांना तूर्तास १०० रुपये सूट मिळणार नसल्याने शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा फटका बसला आहे. बहुतांश हंगामात कापसाच्या व इतर बियाणांची काळाबाजारी होत असते. त्यामुळे पेरणीच्या वेळी पाहिजे असलेले वाण शेतकऱ्यांना घेण्याकरिता मोठी कसरत करावी लागते किंवा अधिक दराने घ्यावे लागते. याचा फार मोठा अनुभव शेतकऱ्यांना असल्यामुळे राज्यातील ४० टक्के शेतकरी हंगामाच्या एखाद्या महिन्यापूर्वी कापूस सोयाबीन बियाणाची खरेदी करीत असतात. यावर्षीसुद्धा शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्यापूर्वीच कापूस बियाणाची खरेदी करुन घेतली. हंगामापूर्वी कापूस बियाणे खरेदी केल्यामुळे शेतकरी आनंदी झाले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने कापूस बियाणांच्या प्रत्येक पॉकीटमागे शंभर रुपये सुट जाहीर केली. ८ जूनपूर्वी बियाणे घेणाऱ्या शेतकऱ्यांना फटका बसला आहे.