आठ नगरपंचायती स्थापणार :
By Admin | Updated: May 7, 2014 01:55 IST2014-05-07T01:55:59+5:302014-05-07T01:55:59+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील आठ नव्या नगर पंचायतींच्या स्थापनेसाठी

आठ नगरपंचायती स्थापणार :
तालुकास्तरावरील ग्रामपंचायतींना मिळणार दर्जा नव्या नगरपंचायतीसाठी अधिसूचनेच्या हालचाली
गोपालकृष्ण मांडवकर ल्ल चंद्रपूर जिल्ह्यातील आठ नव्या नगर पंचायतींच्या स्थापनेसाठी शासकीय स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नगर विकास विभाग मंत्रलायाने आक्षेपही मागविले आहेत. यामुळे येत्या काही दिवसात जिल्ह्यातील आठ तालुका स्तरावरील ग्रामपंचायतीचे रूपांतर नगर पंचायतीमध्ये होण्याच्या शक्यतेला मूर्त रूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात नगर विकास मंत्रालयातून निघालेली ही प्रारूप अधिसूचना १ मार्च २०१४ या तारखेची आहे. या अधिसूचनेनंतर पाच दिवसांनीच म्हणजेच ६ मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी झाली. त्यामुळे हा विषय थंड बस्त्यात पडला होता. निवडणुकीच्या निकालानंतर या प्रारूप अधिसूचनेची अंमलबजावणी होणार असे दिसत आहे. चिमूर येथील एका शासकीय समारंभासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आले असता त्यांच्यासमोर नागरिकांनी चिमूर जिल्हा निर्मीतीची मागणी केली होती.
त्यावर त्यांनी आपल्या भाषणातून चिमूरला नगर पंचायत स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी मंत्रिमंडळाचा ठरावही झाला होता. त्यात चिमूरसह अन्य शहरांचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार नगर विकास विभागाने ही आधिसूचना काढली आहे. या प्रारूप अधिसूचनेनुसार, ज्या तालुका स्तरावर नगर पालिका नाहीत, त्या ठिकाणच्या ग्रामपंचायतीचे रूपांरत नगर पंचायत असे केले जाणार आहे. त्यासाठी सीमांकन, ग्रामपंचायतींचे स्थानिक क्षेत्र, नागरी क्षेत्रामध्ये संक्रमित होणारे क्षेत्र यांचा समावेश आहे. महाराष्टÑ नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्यागिक नगरी अधिनियमाच्या कलम ३४१ (क) चे पोटकलम (१), (१क) आणि (२) या नुसार अधिसूचना काढण्याच्या प्रस्तावावर आक्षेप मागविण्यात आले आहेत. हे आक्षेप ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयात मागविण्यात आले होते. मात्र प्रारूप अधिसूचना निघाल्यावर आचारसंहीता लागल्याने हा विषय थांबला होता. मात्र, त्याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे. स्थापन केल्या जाणार्या नगर पंचायतीचे क्षेत्र दर्शविणारा आराखडा जिल्हाधिकारी कार्यालय आणि संबंधित तहसील कार्यालयांमध्ये नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहे. शहर तालुका मुख्यालयाचे असले तरी कमी लोकसंख्येमुळे अशा ठिकाणी ग्रामपंचायतीच अस्तित्वात आहेत. नगर पालिका स्थापन करण्यासाठी लोकसंख्येचा निकष महत्वाचा मानला जातो. मात्र, या गावांसाठी तो अडचणीचा होता.
परंतु नगरविकास मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याने तालुकास्तरावरील नागरिकांची नाराजी दूर होणार आहे. नगरपालिका निर्मितीमध्ये असलेल्या तांत्रिक अडचणींवर हा नवा पर्याय मानला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी) येथे होणार नगरपंचायती ४ज्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी नगर पालिका अस्तित्वात नाहीत, त्या ठिकाणी नगर पंचायती स्थापन्याचे सरकारचे धोरण आहे. याचा विचार करता, जिल्ह्यातील आठ तालुका मुख्यालयी नगर पालिका नाहीत. अर्थात चिमूर, कोरपना, जीवती, सिंदेवाही, गोंडपिपरी, सावली, पोंभुर्णा आणि नागभीड या ठिकाणी नगर पंचायतींची स्थापना होण्याचे संकेत आहेत. या ठिकाणी नगर पंचायती स्थापन झाल्यास विकासाला वाव मिळणार आहे.