घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : अखेर रेल्वेने बल्लारशा - नागभीड - गोंदिया या मार्गावर २८ सप्टेंबरपासून पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागभीड जंक्शनवरील रेल्वे गाड्यांची ती धडधड आणि निवेदिकेच्या गोड आवाजातील सूचना पुन्हा कानी पडणार आहेत.नागभीड येथे दक्षिण-पूर्व रेल्वेचे जंक्शन आहे. १५० एकर जमिनीत हे रेल्वे जंक्शन विस्तारले आहे. येथून गोंदिया, बल्लारशाह आणि नागपूरकडे रेल्वे गाड्यांचे आवागमन होत असते आणि या गाड्यांनी रोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, कोरोनामुळे या गाड्या बंद करण्यात आल्या. परिणामी नागभीड रेल्वे जंक्शनला अवकळा प्राप्त झाली होती. परंतु, आता पॅसेंजर सुरु होणार असल्याने चहलपहल वाढणार आहे.
या स्थानकाच्या फलाटावर व गाड्यांच्या डब्यातून चहा, नाश्ता व विविध वस्तूंची विक्री करून आपली गुजराण करणारे शेकडोजण रोजगाराअभावी हैराण झाले होते. तेसुद्धा वाट पाहत होते. त्या दिवसांची ज्या दिवसांनी त्यांना रिकामे कधी बसू दिले नाही. पण कोरोना हा संसर्गजन्य आजार आटोक्यात येत नसल्याने रेल्वे विभागापुढेही अडचणी होत्या.
आता या अडचणी दूर झाल्याने रेल्वे विभाग २८ सप्टेंबरपासून या पॅसेंजर सुरू करत आहे.
मागील सर्व बाबी इतिहासात जमा होणार असून, नागभीड येथील रेल्वे जंक्शनलापूर्वीचेच वैभव प्राप्त होणार आहे