टोलनाक्यावर १२ बळी गेल्यानंतर आली जाग ! प्रशासनाच्या निष्काळजीपणाची निष्पाप जीवांना मोजावी लागली किंमत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 19:42 IST2026-01-24T19:40:37+5:302026-01-24T19:42:32+5:30
Chandrapur : तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर ऋषी रामटेके (६०) यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करताच नवेगाव (वाघाडे) येथील बंद अवस्थेतील टोलनाक्याच्या प्रश्नावर अखेर प्रशासन जागे झाले.

After 12 deaths at the toll plaza, the innocent lives had to pay the price for the administration's negligence.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : तालुक्यातील विठ्ठलवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते सुधाकर ऋषी रामटेके (६०) यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर नागरिकांनी संताप व्यक्त करताच नवेगाव (वाघाडे) येथील बंद अवस्थेतील टोलनाक्याच्या प्रश्नावर अखेर प्रशासन जागे झाले. हायमास्ट दिवे व गतिरोधक व सुरक्षा व्यवस्थेसाठी कार्यवाही सुरू केली आहे. या मार्गावर आतापर्यंत १२ जणांचा बळी गेला आहे.
बुधवारी (दि. २१) रात्री ८ वाजता झालेल्या अपघातात रामटेके यांचा मृत्यू झाला, तर मधुकर विठ्ठल मेश्राम गंभीर जखमी झाले. या घटनेने परिसरातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला होता. चार वर्षापासून उभा असलेला, मात्र बंद असलेला नवेगाव टोलनाका अंधार, असुरक्षा आणि निष्काळजीपणाचे प्रतीक बनला होता.
विद्युत प्रकाश व सुरक्षा व्यवस्थेअभावी येथे वारंवार अपघात घडत होते. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी, तहसीलदार शुभम बहाकर, ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांनी पुढाकार घेतला. यावेळी सहायक मोटार वाहन निरीक्षक सूरज मुन, बांधकाम विभागाचे जिल्हा उपअभियंता बोबडे, तालुका उपअभियंता कुकडे अधिकारी उपस्थित होते.
गावकऱ्यांचा संताप
गेल्या दोन वर्षांत या ठिकाणी १२ निष्पाप नागरिकांनी प्राण गमावले, मागील आठवड्यात विठ्ठलवाडा येथील दोन युवकांचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात परिसरातील नागरिकांकडून संताप उसळला होता.
अधिकाऱ्यांची झाली संयुक्त बैठक
शुक्रवारी, दि. २३ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह संयुक्त बैठक घेण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजनांचे आदेश देण्यात आले. दोन दिवसांत विद्युत पुरवठा सुरू करून हायमास्ट दिवे कार्यान्वित करणे, रस्त्यावर ब्रेकर बसवणे, सुरक्षा रक्षकांची नेमणूक, सोलर ब्लिंकर, रेडियम फलक व रस्ता दुरुस्ती अशी कामे करण्यात येणार आहे. कामांचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात पुन्हा बैठक होणार आहे.