जिल्ह्यात आंतर मशागतीच्या कामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 05:00 AM2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:56+5:30
आद्रा नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे छोटे-मोठे नाले वाहते झाले आहेत. खरीपाच्या पिकांसाठी यंदा अनुकूल हवामान व पावसाचीही साथ मिळाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे शेत शिवारात शेतकरी आंतर मशागतीच्या कामात व्यक्त आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : यावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रापाठोपाठ आद्रानेही वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे पीक लागवडीसह बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्या पिकातील आंतर मशागतींना वेग आला असून शेतकऱ्यांसह मजुरांच्या लगबगीने शेतशिवार फुलले आहेत.
आद्रा नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे छोटे-मोठे नाले वाहते झाले आहेत. खरीपाच्या पिकांसाठी यंदा अनुकूल हवामान व पावसाचीही साथ मिळाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे शेत शिवारात शेतकरी आंतर मशागतीच्या कामात व्यक्त आहे. विशेष म्हणजे, धान उत्पादक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आता डवरनी, निंदनाना सुरुवात केली आहे. तर धान उत्पादक असलेल्या सावली, ब्रह्मपुरी, मूल, सिंदेवाही या तालुक्यातील शेतकºयांनी रोवणीसाठी पऱ्हे टाकणे सुरु केले आहे. काहीजण बैलजोडीच्या साहाय्याने पारंपरिक अवजारांसोबतच तर काही ट्रॅक्टरद्वारे मशीगतीची कामे करीत आहे. शाळांना सुटी असल्यामुळे विद्यार्थीही आई-वडीलांना शेतातील मशागतीच्या कामाला हातभार लावत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन, उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
मजुरी वाढल्याने शेतकरी त्रस्त
लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक आडचणीत असतानाच मजुरीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. शेतीची अंतर्गत मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र यासाठी शेतकºयांना प्रत्येक मजुराला जास्तीची मजुरी द्यावी लागत आहे. यामुळे शेती करणे परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शेतीमालाला हमी भाव नसल्याने शेती आर्थिक नुकसान होत आहे. मात्र हाताला काम नसल्यामुळे कसेतरी पोेट भरायचे म्हणून शेती करायची, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.