डीजेच्या तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला 'दुसरा'; विवाह सोहळा ठरला चर्चेचा विषय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 10:30 IST2022-04-26T10:29:33+5:302022-04-26T10:30:37+5:30
मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबरोबर २२ एप्रिलला ठरला होता. दुपारी साधारण ३.३० वाजत लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र झाले उलटे, पाहुणे उशिरा आले.

डीजेच्या तालावर नाचत बसला नवरा, तिने निवडला 'दुसरा'; विवाह सोहळा ठरला चर्चेचा विषय
सिंदखेडराजा : गत काही वर्षांपासून लग्न ठरलेल्या वेळेत लागत नसल्याचे चित्र आहे. याला अनेक कारणे असली तरी नवरदेवांसमोर नाचणारी मंडळी हे एक प्रमुख कारण आहे. डीजेच्या तालावर थिकरणाऱ्या मित्रांच्या नादात एकावर नवरीच गमावण्याची वेळ आली. वरात लग्न मंडपात उशिरा पोहोचल्याने संतप्त झालेल्या वधूकडील मंडळींनी लग्नच मोडले. एवढेच नव्हे तर दुसऱ्याच मुलाबरोबर या मुलीचा विवाहही आटाोपला. मलकापूर पांग्रा येथील हा विवाह सोहळा परिसरातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
मलकापूर पांग्रा येथील मुलीचा विवाह कंडारी येथील युवकाबरोबर २२ एप्रिलला ठरला होता. दुपारी साधारण ३.३० वाजत लग्नाची वेळ होती. त्यापूर्वी वराकडील मंडळी लग्नमंडपात पोहोचणे अपेक्षित होते. मात्र झाले उलटे, पाहुणे उशिरा आले. त्यामुळे लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या धार्मिक विधींना अपेक्षेप्रमाणे उशीर झाला. लग्नाच्या वेळेत विधी झाल्याने परण्या निघण्यासदेखील उशीर झाला. इथपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र, नवरदेवाची वरात निघाली आणि डीजे, बँडच्या तालावर थिरकणारे नवरदेवाचे मित्र मैदानात उतरले. मद्यधुंद अवस्थेत थिरकण्याच्या नादात दुपारचे लग्न तब्बल चार ते पाच तास उशिराने लागण्याची परिस्थिती निर्माण झाली.
लग्न न लावताच परतला नवरदेव
वधूकडील मंडळींचा संयम संपला होता. वरात लग्न मंडपात येताच वधूच्या नातेवाइकांनी नवरदेवाकडील मंडळींना उशीर का केला, असा प्रश्न विचारला. संयम संपलेल्या नवरीकडील मंडळींचा पारा चढलेला होता. तसा नवरदेवाकडील मंडळींचादेखील पारा चढला, वादविवाद, झटापट झाली आणि नवरीकडील मंडळींनी जवळच्या पाहुण्यांशी सल्लामसलत करून नवरदेवाला लग्न न लावताच माघारी जाण्याचे फर्मान काढले! वाद वाढला... पण नवरदेवाकडील मंडळींना अखेर लग्न मंडपातून लग्नाशिवाय काढता पाय घ्यावा लागला.
नाचण्याच्या नादात गमावू नका नवरी
लग्न ठरविताना लग्न मुहूर्त काढला जातो, मात्र सध्याच्या परिस्थितीत मुहूर्तावर कुठेच लग्न लागत नाही. नवरदेवाच्या मित्रमंडळींना थिरकायचे असते तर वधूकडील मंडळींना लग्नापेक्षा सत्कार समारंभात अधिक रस असतो. याचा परिणाम लग्न मुहूर्तावर होऊ लागला आहे. याचा विचार दाेन्हीकडील मंडळींनी करण्याची काळाची गरज आहे.