संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:24 IST2025-06-02T13:19:32+5:302025-06-02T13:24:28+5:30
३३ दिवसांचा ७२५ किमीचा भक्तिपथावरचा प्रवास

संत गजानन महाराज पालखीचे पंढरपूर आषाढी वारीसाठी प्रस्थान; ४ जुलैला पंढरपूरात पोहोचणार
अनिल उंबरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, शेगाव (जि. बुलढाणा) : संत गजानन महाराज संस्थानच्या श्रींच्या पालखीचे यंदा ५६वे वर्ष असून, आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर वारीसाठी २ जून रोजी सकाळी ७ वाजता शेगाव येथून पालखी प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर संतनगरीत भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, ‘गण गण गणात बोते, ज्ञानोबा-तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी’च्या जयघोषात संपूर्ण शहर विठ्ठलमय झाले आहे.
या पालखी सोहळ्यात ७०० हून अधिक वारकरी, रथ, मेणा, अश्व, पताका वाहणारे भक्त सहभागी होणार असून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि श्री विठ्ठलनामाच्या जपात ३३ दिवसांचा सुमारे ७२५ किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण केला जाणार आहे.
१० जुलैपासून परतीचा प्रवास
पालखी ४ जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचेल आणि ९ जुलैपर्यंत श्री गजानन महाराज संस्थानच्या पंढरपूर येथील शाखेत मुक्कामी राहील. १० जुलैपासून परतीचा प्रवास सुरू होईल. ३० जुलै रोजी खामगाव येथे मुक्काम झाल्यानंतर ३१ जुलै रोजी पालखीचे शेगावमध्ये आगमन होईल.
बुधवारी पालखी अकोल्यात
पालखी प्रस्थानानंतर २ जून रोजी दुपारी ती श्रीक्षेत्र नागझरी येथे पोहोचेल. तेथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रीचा मुक्काम पारस येथे होईल. ३ जून रोजी पारसहून पालखी भौरद मार्गे ४ जूनला अकोला येथे दाखल होईल. अकोला येथे दोन दिवस मुक्कामानंतर नियोजित मार्गाने ४ जुलै रोजीच ती पंढरपूरला पोहोचणार आहे.