मराठा आरक्षणाचा विरोध आघाडीला भोवणार- मेटे
By Admin | Updated: May 12, 2014 22:38 IST2014-05-12T19:18:45+5:302014-05-12T22:38:53+5:30
विधानसभा निवडणुकीत शिवसंग्रामची उडी

मराठा आरक्षणाचा विरोध आघाडीला भोवणार- मेटे
खामगाव: राज्यात गेली साठ वर्ष मराठा नेत्यांनी राज्य केले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी पदे उपभोगली. मात्र, मराठा समाजाच्या हिताचा कोणताही निर्णय घेतला नाही. मराठा आरक्षणालाही विरोध केला, त्यामुळेच आपण महायुतीशी कास धरल्याचे शिवसंग्राम या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी येथे स्पष्ट केले. नांदुरा रोडवरील एका हॉटेलमध्ये आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. यावेळी आ. मेटे म्हणाले की, मराठा समाजाच्या तथाकथीत नेत्यांनी समाजहिताकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मराठा समाजाची अवस्था वाईट झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मराठा आरक्षणाकडे कानाडोळा केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाताहत झाली असून ह्यराजकीय आत्महत्याह्ण टाळण्यासाठी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला. शिवसंग्राम या सामाजिक संघटनेच्यामाध्यमातून समाजाच्या विविध समस्या सोडविण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केला आहे. समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडून न्याय दिल्यामुळेच समाज आपल्या पाठीशी आहे. मराठा आरक्षणाच्या लढय़ात आपल्याला सर्वदूर पाठींबा मिळत आहे. समाजातील गरिबांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी ओबीसींमध्ये समावेश करून २५ टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी शिवसंग्राम सातत्याने करीत आहे. मात्र, याकडे सत्ताधार्यांकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे. युती शासनाच्या काळात निर्माण झालेल्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाकडे राजकीय विरोधातून आघाडी शासनाने दुर्लक्ष चालविले आहे. गेल्या १५ वर्षांच्या काळात या मंडळाला शासनाने कोणतीही मदत केली नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. जाती-धर्मापेक्षा न्याय देणारा महत्वाचा असतो. त्यामुळेच आता आपण आपली चूक सुधारली आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीचा प्रचार केला. परंतु, विधानसभा निवडणुकीत महायुतीत शिवसंग्राम पक्ष रिंगणात उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील काही विधानसभेवर शिवसंग्रामचे उमेदवार उभे राहतील. मराठा आरक्षणाची चळवळ गतीमान करण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांना एकत्र करून आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात संपर्क सुरू आहे. या पत्र परिषदेला अकोला जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, बुलडाणा जिल्हाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, राजेंद्र मस्के, पवन शर्मा, रंगरावबापू देशमुख, सचिन देशमुख आदी उपस्थित होते. ** ..तर पहिल्याच अधिवेशनात समाजाला आरक्षण देवू गेली अनेक वर्ष महाराष्ट्रात राज्य करणार्या आघाडी शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष चालविले आहे. आरक्षणाच्या विरोधामुळे जनता त्यांना आपली जागा दाखवून देणार असून राज्यात आघाडीचे पाणीपत होणार आहे. महायुतीचे उमेदवार तब्बल ३५ ठिकाणी विजयी होणार असल्याचे भाकितही त्यांनी यावेळी केले. आघाडी शासनाने आरक्षण न दिल्यास महायुतीची सत्ता आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.