लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 02:44 PM2019-05-05T14:44:43+5:302019-05-05T14:48:59+5:30
लोणार: वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे असणारे लोणार सरोवरातील क्षारयुक्त खारे पाणी झपाट्याने घटताना दिसून येत आहे.
![Lonar crater water lavel reduced | लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट Lonar crater water lavel reduced | लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/lonar-crater-lonar_201905232585.jpg)
लोणार सरोवराच्या जलपातळीतही झपाट्याने घट
- रहेमान नवरंगाबादी
लोणार: वैज्ञानिकदृष्ट्या अतिशय महत्वाचे असणारे लोणार सरोवरातील क्षारयुक्त खारे पाणी झपाट्याने घटताना दिसून येत आहे. सरोवरातील पाण्याने गत १८ वर्षातील सर्वात कमी पातळी गाठली आहे. पुण्यातील सेंटर फॉर सिटिझन सायन्स (सीसीएस) या संस्थेने केलेल्या पाहणीतून ही बाब उघड झाली.
लोणार सरोवरावरील संकटे थांबण्याची चिन्हे नाहीत. सरोवराला येऊन मिळणारे पाचपैकी दोन प्रमुख नैसर्गिक झरे बंद पडल्यामुळे लोणारच्या अभयारण्यातील वन्यजीवन धोक्यात आले आहे. लोणारच्या झऱ्यांचा स्रोत असणाºया भूजलाचा बेकायदा उपसा सुरू असल्यामुळे ही स्थिती उदभवल्याचे समोर येत आहे. उपग्रहीय छायाचित्रे आणि प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे केलेल्या पाहणीतून २०१४ च्या तुलनेत लोणार सरोवराचे पाणी पसरट भागात तब्बल २०० ते ३०० मीटरने मागे गेले आहे. गेल्या दोन वर्षांत कमी पाऊस झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्ष पावसाच्या आकडेवारीवरुन ही बाब समोर आली आहे. २००१ ते २०१६ या कालावधीत लोणारच्या पावसात कोणताही बदल झालेला नसल्याचे राज्य सरकारच्या पावसाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
गेल्या सोळा वर्षांपैकी २००३ मध्ये ४८४ मिलीमीटर तर २००४ मध्ये ४७३.७ मिलीमीटर हा सर्वात कमी पाऊस लोणारमध्ये नोंदवला गेला होता. मात्र, त्या दोन्ही वर्षी लोणार सरोवराचे पाणी सर्वोच्च पातळीवर होते. गेल्या तीन वर्षांत लोणारमध्ये ५१० मिलीमीटर (२०१४), ५४६ मिलीमीटर (२०१५) आणि ७९४ मिलीमीटर (२०१६) पावसाची नोंद झाली. लोणारच्या सरासरी पावसापेक्षा हा पाऊस जास्त आहे. तरीही लोणार सरोवराचे पाणी सर्वांत कमी पातळीवर पोचले आहे. सतत तीन वर्षापासून दुष्काळाची परिस्थिती निर्माण असल्यामुळे जमिनीवरील पाणी आटत आहे. त्याचाही परिणाम दिसून येत आहे.
१९७२ च्या दुष्काळात आटले होते पाणी
१९७२ च्या दुष्काळामध्ये निसर्गनिर्मित जगप्रसिद्ध लोणार सरोवराचे खारे पाणी पूर्णपणे आटले होते. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी सरोवरातील तयार होणारा खार आणून विक्री केला होता. आता तशी परिस्थिती निर्माण होते की काय, असा प्रश्न सरोवर प्रेमी करीत आहे. सरोवराला येऊन मिळणारे नैसर्गिक सर्व झरे आटल्याने पाणीसाठा घटत चालला आहे. ही बाब गंभीर असून सरोवराच्या अस्तित्वावर परिणाम झाला आहे.