चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अपघात टळला, ब्रेक फेल होताच गाडी केली नियंत्रित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2021 16:28 IST2021-07-23T16:25:10+5:302021-07-23T16:28:23+5:30
राज्य परिवहन मंडळाचे डम्पिंग ग्राउंड म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगाव जामोद आगारात बऱ्याच जुनाट व भंगार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच मागील दीड वर्षांपासून कोरोणामुळे अनेक बसेस उभ्या होत्या.

चालकाच्या प्रसंगावधानानं मोठा अपघात टळला, ब्रेक फेल होताच गाडी केली नियंत्रित
नांदुरा - राज्य परिवहन मंडळाचा जळगाव जामोद आगारची बस २२ जुलैच्या दुपारी एकच्या सुमारास नांदुरा ते जळगाव रस्त्यादरम्यान मानेगाव नंतर पूर्णा नदी पुलाजवळ जात होती. त्यावेळी बसचे ब्रेक लागत नसल्याची बाब चालकाच्या लक्षात आली. यानंतर त्याने बस नियंत्रित केली आणि बसमधील सुमारे पन्नास प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. (The driver's foresight averted a major accident)
राज्य परिवहन मंडळाचे डम्पिंग ग्राउंड म्हणून प्रसिध्द असलेल्या जळगाव जामोद आगारात बऱ्याच जुनाट व भंगार बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातच मागील दीड वर्षांपासून कोरोणामुळे अनेक बसेस उभ्या होत्या. जळगाव जामोद आगाराची बस क्रमांक एम. एच. ४० ए क्यू ६३३८ ही सुमारे पन्नास प्रवासी घेऊन दुपारी बारा वाजता जळगाव जामोद वरून नांदुर्याकडे निघाली होती. मानेगाववरून पुढे निघाल्यानंतर पूर्णा नदीवरील पुलाकडे जात असताना बसचे ब्रेक पूर्णपणे काम करीत नसल्याचे चालकाच्या लक्षात आले. मात्र त्याने प्रसंगावधान राखत गाडी पुला पूर्वीच नियंत्रित करून रस्त्याच्या बाजूला सुरक्षित उभी केली.
याबाबतची माहिती प्रवाशांना मिळताच त्यांनी सुटकेचा श्वास सोडला व चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील प्रवाशांचा जीव वाचल्याचा भावना व्यक्त केल्या. चालकाने याबाबतची माहिती जळगाव जामोद आगारातील अधिकाऱ्यांना दिली व त्यानंतर प्रवाशांना इतर बसमधून पाठविण्यात आले. बस चालकाचा प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला. जळगाव जामोद आगारात आगारातील भंगार बसेसचा प्रश्न यामुळे पुन्हा चर्चिला जात असून एकेकाळी राज्यात सर्वात जास्त महसुली उत्पन्न देणार्या या आगाराला राज्य परिवहन मंडळाने नवीन बसेस पुरविण्याची मागणी सुद्धा होत आहे.
नांदुरा-जळगाव जामोद आगाराची बस ही बस पूर्णा नदीवरील पुलाकडे जात असताना तिचे ब्रेक फेल झाले. प्रसंगावधान राखत आरडा ओरड न करता चालकाने पूर्णपणे बस नियंत्रित केली व रस्त्याच्या कडेला उभी केली नंतर याबाबतची माहिती बसमधील वाहक व प्रवाशांना दिली . त्यामुळे सर्व प्रवासी सुरक्षितपणे बसमधून उतरून दुसऱ्या बस व वाहनांनी त्यांच्या घराकडे निघून गेले. यापूर्वी पूर्णा नदीच्या खिरोडा येथील पुलावरुन राज्य परिवहन मंडळाची बस नदीपात्रात कोसळून यामधील काही प्रवाशांचा मृत्यू झाला होता.