जलसाहित्यातून जलसाक्षरता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 15:50 IST2018-11-02T15:49:57+5:302018-11-02T15:50:28+5:30
एकूणच पाणी आणि साहित्याची ही ओळख तशी फार जुनी. पण पाण्याचे भीषण वास्तव लक्षात घेता ही वीण अधिक घट्ट करुन जनमानसात तिचा प्रभाव वाढविण्याची गरज आज निर्माण झाली आहे.

जलसाहित्यातून जलसाक्षरता
सविता देव हरकरे
नागपूर: जलचक्रावर प्रसिद्ध कवी ग.दि. माडगूळकरांची फार सुरेख कविता आहे. ते म्हणतात,
नदी सागरा मिळता
पुन्हा येईना बाहेर
अशी शहाण्याची म्हण
नाही नदीला माहेर
सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर
तरी तिला आठवतो
जन्म दिलेला डोंगर
नदी माहेराला जाते
म्हणूनिच जग चाले
डोंगराच्या मायेसाठी
रुप वाफेचे घेऊन
नदी तरंगत जाते
पंख वाऱ्याचे लावून
काय सांगू रे बाप्यानो
तुम्ही अंधाराचे चेले
पुन्हा होऊन लेकरू
पान्हा फुटता डोंगरा
नदी वाजविते कळा
आणि येतो पावसाळा
तुकारामांच्या अभंगांमधूनही पाणी टंचाई,जलसंचयनाचे महत्व विषद झाले आहे. तर
नगरेची रचावी, जलाशये निर्मावी
महावने लावावी, नानाविधे
असं ज्ञानेश्वर सांगून गेलेत.
येरे घना येरे घना, न्हाऊ घाल माझ्या मना...
असं आरती प्रभू म्हणतात.
नको, नको रे पावसा, असा धिंगाणा घालु
अशी आळवण इंदिरा संतांनी केलीय.
सदानंद देशमुखांची बारोमास असो वा तहान, त्यात पाणी आहेच. शिवाय ना.धो. महानोर, विठ्ठल वाघ, श्री.ना. पेंडसे, गो.नि. दांडेकर, विश्वास पाटील, वसंत बापट यांच्या साहित्यातूनही पाणी अन् मानवी जीवनाचं अतूट नातं व्यक्त झालं आहे. एकूणच पाणी आणि साहित्याची ही ओळख तशी फार जुनी. पण पाण्याचे भीषण वास्तव लक्षात घेता ही वीण अधिक घट्ट करुन जनमानसात तिचा प्रभाव वाढविण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
साहित्याचा आणि साहित्यिकांचा जनमनावरील प्रभाव सर्वांनीच मान्य केला आहे. विचारक्रांती घडविण्याची मोठी ताकद साहित्यात आहे. या ताकदीचा वापर जलजागृतीसाठी झाल्यास जलसंवर्धनाच्या कार्यात त्यांचं मोलाचं सहकार्य लाभू शकतं. आज भारतासह साऱ्या जगाला भेडसावत असलेली पाण्याची समस्या सोडविण्याची जबाबदारी ही काही केवळ शासनाची अथवा शास्त्रज्ञांची नाही. तर ती सामान्यांची सुद्धा आहे. आणि सामान्यांना या कामी प्रेरित करण्याचं महत्वाचं कार्य साहित्यिक करु शकतात. या भूमिकेतूनच जलसाहित्य संमेलन ही संकल्पना अस्तित्वात आली. गेल्या आठवड्यात नागपुरात सातवं जलसाहित्य संमेलन झाले. पाण्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी झटणाऱ्या महिला पाणी मंचनं याचं आयोजन केलं होतं. दोन दिवसांच्या या संमेलनात जलसाहित्यावर तीन परिसंवाद, कविसंमेलन, या क्षेत्रात कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांचे मनोगत असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. या संमेलनाच्या निमित्तानं पाण्याचं संकट आणि बाळगावयाची सतर्कता यावर पुन्हा एकदा चर्चा झाली. लोकप्रबोधन झाले.
रहिमन यांचा एक फार चांगला दोहा आहे.
ते म्हणतात,
रहिमन पानी राखिये, बिन पानी सब सुन
पानी गये न उबरै, मोती मानूस चून
आज पाणी हा अत्यंत चिंतेचा विषय झाला आहे. पावसाचा तुटवडा वाढत असताना जलसंचयनाबाबत अजूनही आम्ही नको तेवढं उदासिन आहोत. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही म्हण आम्ही पैसे बचतीचा विचार करताना हमखास वापरतो. पण ज्या पाण्याचा यात उल्लेख आहे त्याकडं मात्र पद्धतशीर डोळेझाक केली जाते. असं म्हटलं जातंय की जगात तिसरं महायुद्ध झालं तर ते नक्कीच पाण्यावरुन होणार. एवढं पाण्याचा संकट गहिरं होत चाललय. धरणे, नद्यांमधील पाण्यासाठी देशादेशांमध्ये,राज्याराज्यात, शहराशहरात आणि अगदी गावागावांमध्ये तंटे वाढत चाललेय. आक्राळविक्राळ लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी तसेच विकासाच्या नावावर पृथ्वीवरील इतर नैसर्गिक स्रोतांप्रमाणेच पाण्याचा वापरही अमर्याद झाला आहे. त्यात पुन्हा जलप्रदूषणाची फार मोठी समस्या निर्माण झालीय. एकट्या महाराष्ट्राचा विचार केल्यास उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारं सांडपाणी,रासायनिक द्रव्ये, घरगुती सांडपाणी, मैलापाणी अजूनही आम्ही नद्या, ओढे, नाल्यांच्या प्रवाहातच सोडतोय. कपडे, जनावरं, वाहनं याच पाण्यात धुतली जातात. या आणि अशा अनेक कारणांमुळं जलप्रदूषण प्रचंड वाढलंय. नद्या-नाल्यांची अक्षरश: गटारं झालीत. वाढती लोकसंख्या तसेच उच्च राहणीमान,शिक्षण रोजगारासाठी गावांमधून शहराकडे लोकाचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर होतय. परिणामी शहरात पाण्याची मागणी प्रचंड वाढली आहे.
बदलत्या ऋतुचक्रामुळं पाऊसही आता कमी पडायला लागलाय. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये दरवर्षीच दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण होत असते. आताही राज्यातील १३ जिल्ह्यात शासनाने दुष्काळ जाहीर केला आहे.
जलसमस्येवर मात करण्यासाठी शासनस्तरावर जलसंधारण, भूजलपुनर्भरण यासारख्या अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. पण जलसंवर्धनासाठीची सर्वात मोठी आणि प्रभावी उपाययोजना आहे ती जनजागरुकतेची. मग तो जलप्रदूषणाचा प्रश्न असो वा पाण्याच्या अमर्याद वापराचा. कारण याचा थेट संबंध येतो तो लोकांशीच.
अगदी छोट्याछोट्या गोष्टी असतात. घरात वाहता नळ ठेवू नये. पाण्याचा वापर अतिशय काटकसरीने करावा,वाहनं धुण्यासाठी धोधो पाणी वापरणं थांबविलं पाहिजे. वाहनं,धुणीभांडी यासाठी वापरलेलं पाणी परिसरातील व बागेतील झाडांना दिल्यास पाण्याची खूप मोठी बचत होऊ शकते.
गावातून वाहणाऱ्या नद्या, तलावं म्हणजे त्या गावाचा प्राणवायू असतो. पण आज आपण आपल्या चुकीच्या कृतीमुळं हा प्राणवायूच रोखून धरलाय. ही परिस्थिती बदलावी लागणार आहे ती बदलण्यात प्रत्येकाचं सहकार्य आवश्यक आहे. विशेषत: साहित्यिक वर्ग या जलचळवळीत सहभागी झाला तर ही चळवळ अधिक प्रभावी ठरु शकते. पाण्याकडे केवळ तांत्रिकदृष्ट्या बघितलं जाऊ नये. मंगेश पाडगावकर, ना.धों. महानोर, बा.भ. बोरकर, ग.दि. माडगुळकर, सदानंद बोरकर यांच्या काव्यदृष्टीतूनही पाण्याचा विचार व्हावा. पाण्याविषयी भावनिक दृष्टीकोन बाळगून मानवी जीवनात त्याचं असलेलं महत्व, जपणुकीची जबाबदारी स्वीकारण्याची प्रवृत्ती सर्वांनीच बाळगली पाहिजे.