कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 06:00 AM2019-11-06T06:00:00+5:302019-11-06T06:00:53+5:30
भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा नियार्तीवर बंदी आणली होती. मात्र, त्याचा परिणाम सध्या कांद्याच्या भावात झालेला दिसत नाही. उलट कांद्याचे भाव वाढतच आहेत. सप्टेंबर महिन्यात महापुराने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कांदा साठवण चाळीमध्ये पाणी शिरले होते. कांद्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. तसेच मागील महिन्यात परतीच्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा खराब झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : परतीच्या पावसाने विदर्भात सर्वत्र हाहाकार माजला आहे. खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्याचा फटका कांद्यालाही बसला आहे. नवीन कांदा पावसात सापडला असून अनेक ठिकाणी काढणीही लांबणीवर पडली आहे. परिणामी, कांद्याचा भाव चढला असून, कांदा आता ६० रुपयाच्या घरात पोहचला आहे.
भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने कांदा नियार्तीवर बंदी आणली होती. मात्र, त्याचा परिणाम सध्या कांद्याच्या भावात झालेला दिसत नाही. उलट कांद्याचे भाव वाढतच आहेत. सप्टेंबर महिन्यात महापुराने पुणे आणि नाशिक जिल्ह्यात कांदा साठवण चाळीमध्ये पाणी शिरले होते. कांद्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. तसेच मागील महिन्यात परतीच्या पावसाने शेतात काढून ठेवलेला कांदा खराब झाला. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा येण्यास सुरुवात होते.
बाजारात थोड्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक होत आहे. हा कांदा ६० रुपयांच्या जवळपास पोहचला आहे. अनेक हेक्टरवर अजूनही कांद्याचे पीक आहे. ढगाळ वातावरण व सततच्या पावसामुळे नवीन कांद्याचे उत्पादन लांबणीवर पडले आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता नाही. बाजारात व्यापाऱ्यांकडे जुना कांदा शिल्लक आहे. जुना कांदा खराब झाला असल्याने व्यापाऱ्यांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. मात्र चांगल्या जुन्या कांद्याला भाव आला आहे.
भंडारा येथील गंज बाजार तसेच मोठा बाजारमध्ये ठोक विक्रेत्यांशी संपर्क साधला असता, पांढरा कांद्याचे भाव वाढत असल्याने लाल कांद्याची मागणी तसेच विक्री वाढली असल्याचे त्यांनी सांगितले. लाल कांद्याची मागणी पांढऱ्या कांद्याच्या तुलनेमध्ये लाल कांद्याचे भाव कमी असल्यामुळे बाजारामध्ये लाल कांदा मोठया प्रमाणात विक्रीला आला आहे. विशेष म्हणजे, मार्केटमध्ये पांढरा कांदा खराबच येत असल्यामुळे व्यापाऱ्यांनाही मोठे नुकसान सहन करावे लागत असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. एकंदरीत काद्यांच्या वाढलेल्या भावाने गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणले आहे.