उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकल्याने दोन युवक ठार, पवनी वैनगंगा नादीपुलावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2023 14:21 IST2023-11-20T14:20:53+5:302023-11-20T14:21:00+5:30
घटनास्थळी पोलीस दाखल होताच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उभ्या ट्रॅक्टरवर दुचाकी धडकल्याने दोन युवक ठार, पवनी वैनगंगा नादीपुलावरील घटना
- देवानंद नंदेश्वर
भंडारा : पवनी येथून भेंडाळा (चौ.) कडे जात असताना दुचाकी धानाचे पोते भरून उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर धडकली. यात दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास पवनी नजिकच्या वैनगंगा नदी पुलावर घडली. पियुष गजानन राजभोयर (१७, भेंडाळा) व निलेश श्रीपत मेश्राम(२४, दहेगाव), अशी मृत युवकांची नावे आहेत.
भेंडाळा(चौ) येथे रविवारी मंडई उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उत्सव बघण्यासाठी निलेश मेश्राम हा भेंडाळा येथे सोनटक्के यांचे घरी पाहुणा म्हणून आला होता. तो गजानन राजभोयर याचा मित्र होता. सायंकाळी दोघेही पवनीला दुचाकीने गेले होते. कामे आटोपून गावाकडे परतत असताना वैनगंगा नदी पुलावर उभ्या असलेल्या गुड्डू रघुते रा. कुर्झा यांच्या ट्रॅक्टरवर दुचाकी आदळली. यावेळी दोघांनाही गंभीर दुखापत झाली.
ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच बघ्यांची गर्दी उसळली. घटनास्थळी पोलीस दाखल होताच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी पवनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास ठणेदार नरेंद्र निस्वादे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक निखिल राहाटे करीत आहेत.
पुलावर स्ट्रीट लाईटची गरज
पुलावरील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून याला पुलावरील अंधार कारणीभूत ठरत आहे. ट्रॅक्टरला इंडिकेटर व रिफ्लेक्टर नसल्याने दुचाकीस्वारास ट्रॅक्टर दिसले नाही व त्यांचा करूण अंत झाला. पुलावर प्रकाशाची व्यवस्था असती तर कदाचित अनर्थ टळला असता? म्हणून प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन वैनगंगा नदी पुलावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था लावण्याची मागणी प्रवासी जनतेनी केली आहे.