तीन महिन्यात उपाययोजना शून्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 01:07 IST2019-04-08T01:07:05+5:302019-04-08T01:07:47+5:30
दरवर्षीच येतो उन्हाळा. दरवर्षीच्याच उपाययोजना, पण फरक एवढाच तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार प्रशासनाकडून होतोय. जानेवारी ते मार्च तीन महिने निघून गेले तरी पाणी टंचाई आराखड्यातील एकही प्रस्तावित कामे झाली नाहीत.

तीन महिन्यात उपाययोजना शून्य
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : दरवर्षीच येतो उन्हाळा. दरवर्षीच्याच उपाययोजना, पण फरक एवढाच तहान लागल्यावर विहिर खोदण्याचा प्रकार प्रशासनाकडून होतोय. जानेवारी ते मार्च तीन महिने निघून गेले तरी पाणी टंचाई आराखड्यातील एकही प्रस्तावित कामे झाली नाहीत.
जिल्हाधिकारी भंडारा यांनी यांच्याद्वारे १४ जानेवारीच्या पत्रानुसार टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा यांनी पाणी टंचाई मंजूर आराखडाची प्रत मोहाडी पंचायत समितीला १६ जानेवारी रोजी पाठविली. जिल्हास्तरावरून इकडची कागदपत्रे, नियोजन आदी संदेश तालुकास्तरावर पोहचली. तथापि जानेवारी ते मार्च २०१९ करिता तयार करण्यात आलेला संभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ बृहत आराखड्यातील प्रस्तावित एकही उपाययोजनेला प्रारंभ झाला नाही. मोहाडी तालुक्यात जानेवारी ते मार्च महिन्यात विहिरीतील गाळ काढणे, विहिर खोल करणे अशी ४० यातून २३ कामे करायची होती. तसेच नळ योजनेची विशेष दुरुस्तीची ६ कामे,विंधन विहिरीची विशेष दुरुस्तीची १८ कामे, विंधन विहिरी घेणे ३३ कामे, कुपनलिका एक अशी १३३ कामाच्या संख्येतून ८१ कामांची उपाययोजना करावयाची होती. या कामावर ९७ लक्ष रुपये खर्च करावयाचे होते. ही सर्व कामे मार्च अखेर पूर्ण करावयाची होती. मात्र एकही कामे प्रशासनाच्या वतीने करण्यात आली नाहीत.
एप्रिल ते जून या महिन्यातही पाणी टंचाईसाठी आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्यालाही मंजुरी प्राप्त झाली आहे. एप्रिल ते जून या महिन्यात ९६ कामापैकी ६७ कामाची उपाययोजना करावयाची आहे. या कामासाठी ८२ लक्ष ५८ हजार रुपये खर्चाची मर्यादा आहे. यात विहिरीची गाळ काढणे, विहिरी खोल करणे २१ कामे नळ योजनांची विशेष दुरुस्तीची ७ कामे, विंधन विहिरीची, विशेष दुरुस्तीची ९ कामे, विंधन विहिरीची २९ कामे तसेच कुपनलिका घेणयाचे एक काम असे जून अखेर ६७ काम करावयाची आहेत. सध्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. विहिरी खोल गेल्या, हातपंपाच्या पाण्याची पातळी खोलवर गेली, नदी नाले तलाव कोरडे पडले आहेत. पिण्याचे पाणी टंचाईकरिता ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्या योजनांची निधी मार्च २०१९ ला प्राप्त झाल्याचे पंचायत समितीमधील बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.