पावसाचे अवकाळी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:00 AM2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:25+5:30

गत तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात असलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर असलेले धान ओले होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. वर्षभर अवकाळी पावसाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील शेतकरी भागवत काळे म्हणाले, सततच्या पावसाने आमचे प्रचंड नुकसान होत आहे.

Precipitation crisis | पावसाचे अवकाळी संकट

पावसाचे अवकाळी संकट

Next
ठळक मुद्देवातावरणात प्रचंड गारठा : हरभरा, लाखोरी, तूर पिकांसह पालेभाज्यांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सरत्या वर्षाच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस बरसत असून तीन दिवसांपासून बरसणाऱ्या या पावसाने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे. हरभरा, लाखोरी, तूर या पिकांसह पालेभाज्यांचे नुकसान झाले असून आधारभूत केंद्रावरील धान ओलाचिंब होत आहे. गुरुवारी सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. या सततच्या पावसाने वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाला असून गत २४ तासात १०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
भंडारा शहरासह तुमसर, पवनी, लाखनी, साकोली, मोहाडी, लाखांदूर तालुक्यात गुरुवारी सकाळी मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. वीजांचा कडकडाटही होत होता. दुपारी ३ वाजेपर्यंत सारखा पाऊस कोसळत होता. तुमसर तालुक्यात सर्वदूर पाऊस कोसळला. मोहाडी शहरासह तालुक्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. जांब लोहारा परिसरात जोरदार पाऊस कोसळला. लाखनी तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. पालांदूर परिसरात सकाळी १० वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरासह शहापूर, जवाहरनगर येथे जोरदार पाऊस कोसळला. वरठी परिसरात सकाळपासूनच पाऊस कोसळत होता.
वरठी येथे सकाळी ९ वाजता पावसाला प्रारंभ झाला. थंडीचा पारा घसरल्याने कामाची गती मंदावली. वरठी येथील आठवडी बाजारालाही या पावसाचा फटका बसला. करडी परिसरात तीन तास मुसळधार पाऊस कोसळला. पालोरा येथील धान खरेदी केंद्राला तळ्याचे स्वरुप आले होते. खरबी परिसरात पावसाने हरभरा पिकाचे मोठे नुकसान झाले. विष्णुदास हटवार, दसाराम वाघमारे, राकेश गायधने, बाबुजी गायधने, धनराज गायधने, दुर्योधन गायधने, श्रीकृष्ण गायधने, मोरेश्वर गायधने, लोमेश्वर वाघमारे यांच्या शेतातील हरभरा पीक पाण्याखाली आले.
या पावसाने रबी पीकांचे मोठे नुकसान होत असून वातावरणात प्रचंड गारवा निर्माण झाल्याने ठिकठिकाणी भरदिवसा शेकोट्या पेटविल्याचे दृष्य दिसत होते.
गत तीन दिवसांपासून पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेतात असलेले पीक उद्ध्वस्त होत आहे. तर दुसरीकडे खरेदी केंद्रावर असलेले धान ओले होत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. वर्षभर अवकाळी पावसाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथील शेतकरी भागवत काळे म्हणाले, सततच्या पावसाने आमचे प्रचंड नुकसान होत आहे. धान ओला होत असून हरभरा, लाखोरी, तूर आदी पीकांचे नुकसान होत आहे. धान विक्रीसाठी न्यावा तर तेथे मोठी प्रतीक्षा करावी लागते. निसर्गाच्या या लहरीपणापुढे आम्ही हतबल झाल्याचे त्यांनी सांगितले.
लाखांदूर तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत असल्याचे दिसून आले. आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची शेकडो पोती उघड्यावर आहेत. या धानाच्या संरक्षणासाठी कोणतेही साहित्य उपलब्ध नसल्याने धान ओले होत आहेत. यासोबतच तालुक्यात हरभरा, वाटाणा, लाखोरी, उडीद, मुग, जवस आदी पिकांचेही अवकाळी पावसाने नुकसान होत आहे. तूर व भाजीपाला पिकाचेही प्रचंड नासाडी होत आहे. वातावरणात प्रचंड गारठा वाढल्याने ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे दृष्य दिसत आहे.
जिल्ह्यात अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अशी मागणी आहे.

तुमसर तालुक्यात गारांचा वर्षाव
तुमसर तालुक्यातील रेंगेपार परिसरात गुरुवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास बोराच्या आकारांचा गारांचा वर्षाव झाला. पांजरा, तामसवाडी यासह सिहोरा परिसरातील काही गावात दुपारी गारांचा वर्षाव झाला. अवकाळी पाऊस आणि गारांमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. सिहोरा परिसरातील भाजीपाला पिकाला या गारांचा मोठा फटका बसला.
२४ तासात १०.६ मिमी पाऊस
भंडारा जिल्ह्यात गत २४ तासात १०.६ मिमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे १ जानेवारी रोजी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ६१.३ मिमी पाऊस कोसळला होता. गत २४ तासात शहापूर परिसरात १० मिमी, भंडारा ५ मिमी, धारगाव २ मिमी, बेला ३ मिमी., तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी मंडळात ७.३ मिमी, तुमसर ८.३ मिमी, सिहोरा १७.२ मिमी, मिटेवानी ६.२ मिमी, गर्रा १५ मिमी पावसाची नोंद झाली.
धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ
जिल्ह्यातील बहुतांश सर्वच आधारभूत खरेदी केंद्रावर शेतकºयांचा धान उघड्यावर आहे. अवकाळी पाऊस बरसत असल्याने धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ होतांना दिसत आहे. मात्र मोठ्या प्रमाणात असलेला धान झाकणे शक्य होत नाही. ताडपत्री टाकल्यानंतरही धान ओला होत आहे. काही ठिकाणी तर सततच्या पावसाने पोत्यातीलच धान अंकुरल्याचे दिसत आहे. ओला झालेल्या धानाची आधारभूत केंद्रावर खरेदी केली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना धान वाळविण्याशिवाय पर्याय नाही.

Web Title: Precipitation crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस