३१ मार्चपर्यंत दिव्यांगांनी यूडीआयडी कार्ड लिंक करा; अन्यथा योजना, अनुदान होणार बंद !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:53 IST2026-03-26T16:52:38+5:302026-03-26T16:53:46+5:30
Bhandara : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभघेणाऱ्या दिव्यांगांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत, यूडीआयडी (युनिक डिसअॅबिलिटी आयडी) कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे.

Persons with disabilities should link their UDID cards by March 31; otherwise, schemes and grants will be discontinued!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा लाभघेणाऱ्या दिव्यांगांसाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत, यूडीआयडी (युनिक डिसअॅबिलिटी आयडी) कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसीद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत मिळणारे मासिक मानधन अखंडित सुरू राहावे, यासाठी लाभार्थ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आधार लिंकिंगमुळे केवळ पात्र दिव्यांगांनाच शासकीय मदतीचा लाभमिळणे सुनिश्चित होईल.
पोर्टलवर ई-केवायसी अद्ययावत कशी करावी ?
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जावे लागेल. यासाठी आधार कार्ड आणि यूडीआयडी कार्ड सोबत नेणे आवश्यक आहे. संबंधित केंद्रावर बायोमेट्रिक किंवा ओटीपीच्या माध्यमातून माहिती पोर्टलवर अद्ययावत केली जात असल्याचे सांगण्यात आले.
...अन्यथा अनुदान बंद
ज्या लाभार्थ्यांनी यूडीआयडी कार्ड आधारशी लिंक केलेले नाही, त्यांचे अनुदान शासनाकडून थांबविले जाऊ शकते. यामुळे मासिक मानधनासह शैक्षणिक व आर्थिक सवलती मिळण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी हे लिकिंग पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आहे.
काय आहे यूडीआयडी कार्ड ?
यूडीआयडी (युनिक डिसअॅबिलिटी आयडी) हे दिव्यांग व्यक्तींसाठीचे राष्ट्रीय ओळखपत्र असून, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ते महत्त्वाचे साधन ठरते. या कार्डद्वारे विविध सवलती आणि योजनांसाठी एकच अधिकृत पुरावा उपलब्ध होतो. त्यामुळे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीकडे यूडीआयडी कार्ड असणे अनिवार्य मानले जात आहे.
३१ मार्च पर्यंत यूआयडी कार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य
या कालावधीत लिंकिंग न केल्यास अनुदानासह विविध योजनांचे लाभथांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन आहे.