शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आधारभूत किंमतीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 06:00 IST2020-03-06T06:00:00+5:302020-03-06T06:00:11+5:30

भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदी केंद्रावर पणन महासंघाच्यावतीने धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या जिल्ह्यातील ८४ केंद्रावर धान खरेदी सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१ लाख १२ हजार १५४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २० लाख ६६ हजार ९६१ क्विंटल तर अ ग्रेडचा ४५ हजार १९२ क्विंटल धान आहे. या धानाची किंमत आधारभूत किंमती १८१५ प्रमाणे ३८३ कोटी ४४ लाख ६३ हजार ६२३ रुपये आहे.

Payment of paddy to farmers at the base price only | शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आधारभूत किंमतीनेच

शेतकऱ्यांना धानाचे चुकारे आधारभूत किंमतीनेच

ठळक मुद्दे२१ लाख क्विंटल खरेदी : कोट्यवधीचे चुकारे थकीत

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शासकीय धान खरेदी बंद होण्याला अवघे तीन आठवडे असतांना शेतकऱ्यांना आधारभूत किंमतीनेच धान खरेदीचे चुकारे देण्यात येत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. जिल्ह्यात २१ लाख १२ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली असून त्याची आधारभूत दराने किंमत ३८३ कोटी ४४ लाख रुपये आहे. अद्यापही एकाही शेतकऱ्याला वाढीव दर आणि बोनसनुसार चुकारे दिले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये शासनाकडे थकीत आहेत.
भंडारा जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून आधारभूत धान खरेदी केंद्रावर पणन महासंघाच्यावतीने धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या जिल्ह्यातील ८४ केंद्रावर धान खरेदी सुरु आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २१ लाख १२ हजार १५४ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. त्यात सर्वसाधारण ग्रेडचा २० लाख ६६ हजार ९६१ क्विंटल तर अ ग्रेडचा ४५ हजार १९२ क्विंटल धान आहे. या धानाची किंमत आधारभूत किंमती १८१५ प्रमाणे ३८३ कोटी ४४ लाख ६३ हजार ६२३ रुपये आहे. आतापर्यंत २७० कोटी ४८ लाख ७० हजार १९९ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. तर ११२ कोटी ९५ लाख ९३ हजार ४२३ रुपयांचे चुकारे बाकी आहेत. विशेष ही सर्व रक्कम आधारभूत किंमतीप्रमाणे आहे.
शासनाने धानाला आधारभूत किंमती १८१५ रुपये घोषित केली. त्यानंतर शासनाने धानाला ५०० रुपये बोनस आणि २०० रुपये प्रोत्साहन असे ७०० वाढीव दर दिले होते. याबाबत घोषणाही करण्यात आली होती. मात्र भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत खरेदी केलेल्या धानाचे चुकारे आधारभूत किंमतीनुसारच म्हणजे १८१५ रुपयाप्रमाणे करण्यात आले. आधारभूत किंमतीचीच ११२ कोटी ९५ लाखांचे चुकाने थकीत आहेत. त्यात ७०० रुपये वाढीव दराची वाढ केल्यास हा आकडा कोट्यवधीच्या घरात जातो. परंतु आतापर्यंत शेतकऱ्यांना वाढीव दरानुसार चुकारेच करण्यात आले नाही. आधीच जिल्ह्यातील शेतकरी आसमानी संकटाचा सामना करीत आहे. शेतकºयांना पैशाची निकड असून धान उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.

६८ हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा
आधारभूत धान खरेदी केंद्रावर जिल्ह्यातील ६८ हजार ४१ शेतकऱ्यांनी आपला धान विकला आहे. आता ३० मार्चपासून धान खरेदी बंद होणार आहे. त्यामुळे धान खरेदी बंद होण्यापुर्वी बोनससह सर्व रक्कमेचे चुकारे व्हावे, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. मात्र शासकीय स्तरावर वाढीव ७०० रुपयांच्या रकमेबाबद कोणत्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना बोनस आणि वाढीव रकमेसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Payment of paddy to farmers at the base price only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.