धान खरेदीची मर्यादा साडेआठ लाख क्विंटलवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST2022-06-08T05:00:00+5:302022-06-08T05:00:11+5:30
जिल्ह्याचे नेहमीचे धान खरेदीचे सरासरी उद्दिष्ट २५ लाख क्विंटल असताना चुकीच्या आकडेवारीमुळे शासनाकडून राज्याला केवळ ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले. जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट्ये आले. त्यामुळे १ जून रोजी सुरू झालेली धान खरेदी तीन दिवसांतच बंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठविला. त्याला शासनाकडून उशिरा का होईना प्रतिसाद मिळाला. मात्र वाढ अल्प करण्यात आली.

धान खरेदीची मर्यादा साडेआठ लाख क्विंटलवर
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : धान खरेदीच्या मर्यादेवरून जिल्ह्यात वादळ उठले असताना शासनाने आता धान खरेदीची मर्यादा पाच लाखांहून साडेआठ लाख क्विंटलवर केली आहे. याबाबत जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सोमवारी नवीन परिपत्रक काढले आहे. मर्यादा वाढविली असली तरी तीही अत्यल्प असल्याने शेतकऱ्यांचा रोष कायम आहे. संपूर्ण धान खरेदीची शेतकऱ्यांची मागणी आहे.
जिल्ह्याचे नेहमीचे धान खरेदीचे सरासरी उद्दिष्ट २५ लाख क्विंटल असताना चुकीच्या आकडेवारीमुळे शासनाकडून राज्याला केवळ ११ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट मिळाले. जिल्ह्याच्या वाट्याला केवळ पाच लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट्ये आले. त्यामुळे १ जून रोजी सुरू झालेली धान खरेदी तीन दिवसांतच बंद करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी या विरोधात आवाज उठविला. त्याला शासनाकडून उशिरा का होईना प्रतिसाद मिळाला. मात्र वाढ अल्प करण्यात आली.
१५ जूनपर्यंत धान खरेदी
- जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सोमवार ६ जूनला काढलेल्या नव्या परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यातील आधारभूत धान खरेदी योजने अंतर्गत सुरू असलेल्या सर्व संस्थांना रब्बी पणन हंगाम २०२१- २०२२ साठी जुन्या पत्रकानुसार धान खरेदीकरिता ४ लाख ९१ हजार ९९६ क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. नव्या पत्रकानुसार उद्दिष्ट तीन लाख ७७ हजार ५४७ क्विंटल वाढविण्यात आलेले आहे. त्यामुळे आता खरेदीचे उद्दिष्ट आठ लाख ६९ हजार ५४४ क्विंटल ठरवून दिल्याचे म्हटलेले आहे. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार धान खरेदीचे उद्दिष्ट केंद्रनिहाय नसून जिल्हानिहाय आहे. तसेच आपल्या खरेदी केंद्रावर १५ जूनपर्यंत धान खरेदीचे काम पूर्ण करावयाचे आहे.