रेतीची खुलेआम तस्करी सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:58+5:30

वैनगंगा नदीसह चुलबंद, सूर व बावनथडी नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यात येतो. विशेषत: तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली व भंडारा हद्दीतील रेतीघाटामधून रेतीची तस्करी होत आहे. रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीमाफियांनी नवीनच शक्कल लढविली आहे. रेतीची मोठ्या प्रमाणात डम्पींग करण्यात येऊन त्याची नंतर ट्रॅक्टर व टिप्परमधून विल्हेवाट लावण्यात येत आहे.

Open smuggling of sand continues | रेतीची खुलेआम तस्करी सुरुच

रेतीची खुलेआम तस्करी सुरुच

ठळक मुद्देकोट्यवधींचा महसूल पाण्यात : शहरातूनही धावताहेत रेतीचे ट्रॅक्टर

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्याला वरदान लाभलेल्या रेती या गौण खनिजाची खुलेआम तस्करी सुरु आहे. रेतीघाटांचे लिलाव न झाल्याने रेती तस्करांचे चांगलेच फावले आहे. उल्लेखनीय म्हणजे भंडारा शहरातूनच रेती भरलेले ट्रॅक्टर धावत आहेत. याला प्रशासनाची मूक संमती म्हणावी काय? अशी चर्चाही जनमानसात सुरु आहे.
वैनगंगा नदीसह चुलबंद, सूर व बावनथडी नदीपात्रातून रेतीचा उपसा करण्यात येतो. विशेषत: तुमसर, मोहाडी, लाखनी, साकोली व भंडारा हद्दीतील रेतीघाटामधून रेतीची तस्करी होत आहे. रेतीघाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीमाफियांनी नवीनच शक्कल लढविली आहे. रेतीची मोठ्या प्रमाणात डम्पींग करण्यात येऊन त्याची नंतर ट्रॅक्टर व टिप्परमधून विल्हेवाट लावण्यात येत आहे. पाच दिवसांपूर्वीच मोहाडी तालुक्यात डम्पींग केलेला रेतीचा साठा जप्त करून त्याची एका कंत्राटदाराला ती रेती अलॉट करण्यात आली होती. याबाबतही तालुक्यात खमंग चर्चा रंगली होती. तुमसर तालुक्यातही रेती तस्करांचा हैदोस असून नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरु आहे. लाखनी तालुक्यातील चुलबंद नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे खणन सुरु आहे. विशेष म्हणजे तस्करांनी काही नदीघाटांवर मातीचा थर घालून नदीपात्रात जाण्यासाठी रस्त्याच तयार केला होता. मात्र गावकऱ्यांच्या तक्रारीनंतर हा रपटा फोडण्यात आला होता. गोंदी, ढिवरखेडा अंतर्गत बघाडी डोहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा रपटा होता. तसेच शेतातून पांधन रस्ता तयार करून तस्करांनी शेतशिवारातून बेकायदेशिररित्या रेतीची तस्करी सुरु केली होती. ठिकठिकाणी रेतीचे ढिगारेही दिसून येत होते. प्रशासनाने वेळीच रेतीघाटांचे लिलाव करून महसूल गोळा करावा अशी मागणी आहे.

लिलाव केव्हा होणार?
जिल्ह्यातील रेतीघाटांचे लिलाव केल्यास शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळू शकतो. प्रक्रिया लांबत असल्याने रेतीघाटांमधून रेतीची तस्करी थांबण्याचीही प्रक्रिया थांबू शकेल. मात्र चोरटे विविध शक्कल लढवून रेतीचे खणन करीत आहे. यावर आळा घालण्याची मागणी आहे.

Web Title: Open smuggling of sand continues