एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 20:18 IST2026-04-06T20:14:24+5:302026-04-06T20:18:11+5:30
Bhandara : नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात पूर्वी जमीनदारी होती. लगान वसूल करून ते उपजीवीका करत होते. स्थानिकांना रोजगाराही मिळत होता. पण, ही जागा व्याघ्र प्रकल्पात गेली.

Once upon a time, the owner of 1400 acres of land living by picking flowers; A tragic situation for the descendants of the Gond king
गोविंद हटवार
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली (जि. भंडारा) : नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात पूर्वी जमीनदारी होती. लगान वसूल करून ते उपजीवीका करत होते. स्थानिकांना रोजगाराही मिळत होता. पण, ही जागा व्याघ्र प्रकल्पात गेली. काही जागा अजूनही प्रकल्पात जात आहे. मोहफुले वेचून उपजीविका करणे अशी विदारक परिस्थिती आता गोंड राजाच्या वंशजांवर येऊन ठेपली आहे.
ही कहाणी आहे तुकारामबापू हरिसिंग मोकाशी (गोंड) यांची. ते साकोली तालुक्यातील जांभळी येथील रहिवासी. त्यांच्याकडे १४ शे एकरपेक्षा जास्त जंगल त्यांच्या मालकीचे होते. त्यावेळी स्वातंत्र्यानंतर त्यांनी ६०० एकर जागा एफडीसीएला दान दिली. ७५० एकरचा एक पट्टा पांगळी येथे होता. त्यांचा मुलगा रामचंद्रबापू मोकाशी यांनी यासंदर्भात भूमिअभिलेख साकोली यांच्याशी २००० मध्ये पत्रव्यवहार केला होता. त्याचे उत्तर काही मिळाले नाही. रामचंद्रबापू यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. चारही मुलींचे लग्न झाले. भूवनशहाँ हा वारस जांभळीत राहतो. त्यानेही त्या कागदपत्रांची माहिती घेतली. तेव्हा ती जागा आता सरकारजमा झाली. पण, ती जागा सरकारजमा का झाली, यासंदर्भात त्यानेही भूमिअभिलेख विभागाला पत्रव्यवहार केली. मात्र, त्यालाही त्याचे उत्तर मिळाले नाही. आता जमीनदारी गेल्यामुळे मोहफुले वेचून उपजीविका करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. उर्वरित जांभळी गावालगतच्या थोड्याफार जमिनीत धानपीक लावले. पण, त्याची खरेदी सरकारने केली नाही. त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. पांगळी येथील जमिनीचा मोबदला मिळावा, यासाठी त्यांनी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या उपवनसंरक्षक, गोंदिया, व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक, साकोली यांच्याशी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पत्रव्यवहार केला. पुढे आश्वासनाव्यतिरिक्त फारसे काही झाले नाही.
पांगळीची विहीर बुजली
पांगळी हे रिठी गाव. येथे आदिवासींची दहा-बारा घरे होती. घनदाट अरण्य असल्याने हळूहळू लोकं बाहेर पडली. स्वातंत्र्योत्तर काळात येथे चिमणा नावाची आदिवासी महिला (राणी) राहायची. ती तिथं शेती करत होती. सिंचनासाठी एक बोळी (छोटा तलाव) होती. ती बोळी आताही आहे. शिवाय पांगळीच्या विहिरीचे पाणी लोकं पित होते. ती शिवणटोला येथून पेटते कोळसे नेऊन जंगलात चूल पेटवायची. तत्पूर्वी या पांगळीत धानापासून तांदुळ बनविण्याची छोटी चक्की होती, असे जुने जाणकार सांगतात.