अपघातात आई हिरावली, तीन चिमुकल्या अनाथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:01 IST2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:01:05+5:30
पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने त्यांनी संसाराचा गाडा ओढणे सुरू केले होते. आपल्या मुलीचे भविष्य उज्वल करण्यासाठी त्या धडपडत होत्या. आशा सेविका म्हणून काम करताना त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेत होत्या. कोरोना संकटकाळात त्या मदतीसाठी धावून जात होत्या. अशा सुस्वभावी रेखावर काळाचा घाला आला आणि एका अपघाताने संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट आले.

अपघातात आई हिरावली, तीन चिमुकल्या अनाथ
तुलसीदास रावते ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनारा : पतीच्या मृत्युनंतर संसाराचा गाडा ओढत तीन चिमुकल्या मुलींचे भविष्य ती घडवित होती. आशा सेविका म्हणून परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेत होती. मात्र गुरूवारी ट्रक काळ होवून आला आणि बेसावध क्षणी तीन चिमुकल्यांच्या मातेला हिरावून नेले. आता या तीन चिमुकल्या बहिणी अनाथ झाल्या आहेत. तुमसर तालुक्यातील साखळी येथे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे रात्री उपचारादरम्यान निधन झाल्याने चिचोली गावावर शोककळा पसरली आहे.
रेखा दिनेश पारधी (३३) रा. चिंचोली असे मृत महिलेचे नाव आहे. गुरूवारी आपले कर्तव्य बजावून ती दुचाकीने गावाकडे येत होती. त्यावेळी एका ट्रकखाली दुचाकी चिरडली गेली. त्यात खुशबू उर्फ करिश्मा पारधी (२३) ही जागीच ठार झाली. तर रेखा आणि विद्वेश्वरी ठाकूर या गंभीर जखमी झाल्या. रेखा पारधी यांना उपचारासाठी भंडारा येथे दाखल करण्यात आले. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
रेखाचे पती दिनेश यांचा सर्पदंशाने १८ ऑक्टोबर २०१३ रोजी मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्यावर आभाळ कोसळले. जान्हवी, लावण्या आणि किर्ती या तीन मुलीचे भविष्य त्यांच्यापुढे उभे होते. अशातच घरच्या मंडळीचा सहकाऱ्याने त्यांनी आशा सेविका म्हणून सेवा सुरू केली. अगदी तुटपुंज्या पगारात त्या नोकरी करीत होत्या. घरी आजारी असलेल्या सासूची सुश्रृशा त्यांना करावी लागत होती.
पतीच्या निधनानंतर मोठ्या हिंमतीने त्यांनी संसाराचा गाडा ओढणे सुरू केले होते. आपल्या मुलीचे भविष्य उज्वल करण्यासाठी त्या धडपडत होत्या. आशा सेविका म्हणून काम करताना त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचीही काळजी घेत होत्या. कोरोना संकटकाळात त्या मदतीसाठी धावून जात होत्या. अशा सुस्वभावी रेखावर काळाचा घाला आला आणि एका अपघाताने संपूर्ण कुटुंबावर मोठे संकट आले.
रेखा या तुमसर येथे एका रुग्णाच्या प्रकृती संदर्भात चौकशी करण्यासाठी गेल्या होत्या. तेथून परत येत असताना दुचाकीचा अपघात झाला. आता जान्हवी, लावण्या आणि किर्ती या तिनही मुली अनाथ झाल्या.
सतत आजारी असणाºया आजीवर त्यांचा भार आला आहे. अशा परिस्थितीत या तीन चिमुकल्या मुलींसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, ही अपेक्षा आहे.
शासनाकडून मदतीची परिवाराला अपेक्षा
आशा सेविका रेखा पारधी यांचा अपघाती मृत्यू झाला. त्या तुमसर येथे एका रुग्णाला मदत करण्यासाठी गेल्या होत्या. कर्तव्यावरून परत येत असताना हा अपघात झाला. तीन चिमुकल्या अनाथ झाल्या. आता शासनाने या कुटुंबासाठी मदत द्यावी, अशी अपेक्षा तुमसर तालुक्यातील चिंचोली येथील नागरिक करीत आहे. या अपघाताने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून या चिमुकल्यांचा आक्रोश हृदय हेलावून टाकणारा होता.