डिझेल दरवाढीने धानाचे सिंचन महागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 22:09 IST2018-09-19T22:08:51+5:302018-09-19T22:09:08+5:30
तीन आठवड्यांपासून विदर्भासह राज्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात धान पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. भारनियमनामुळे डिझेल इंजिनावर सिंचन केले जात आहे. मात्र दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीने सिंचन महागले आहे. डिझेलचे भाव ७८ रुपयांवर पोहचल्याने सिंचनासाठी एका तासाला ३०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

डिझेल दरवाढीने धानाचे सिंचन महागले
युवराज गोमासे।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : तीन आठवड्यांपासून विदर्भासह राज्यात पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात धान पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. भारनियमनामुळे डिझेल इंजिनावर सिंचन केले जात आहे. मात्र दररोज वाढणाऱ्या डिझेलच्या किमतीने सिंचन महागले आहे. डिझेलचे भाव ७८ रुपयांवर पोहचल्याने सिंचनासाठी एका तासाला ३०० ते ५०० रुपये मोजावे लागत आहे. याचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भातील भात उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.
सुरुवातीला निसर्गाने चांगली साथ दिल्याने पूर्व विदर्भातील भात पीक जोमाने वाढू लागले. मात्र तीन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे भात पीक संकटात आले आहे. अशीच अवस्था पश्चिम विदर्भातील कपाशी आणि सोयाबीनची आहे. अशा परिस्थितीत पीक वाचविण्यासाठी शेतकरी सिंचन करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र ग्रामीण भागातील कृषी फिडरवर १४ तासाचे भारनियमन आहे. त्यातच कृषी फिडरला रात्रीच्या वेळी वीजपुरवठा केला जातो. रात्री मजूर मिळत नसल्याने ओलीत करणे शक्य होत नाही. परिणामी अनेक शेतकºयांनी आता डिझेल इंजिनचा आधार घेतला आहे. डिझेल इंजिन भाड्याने घेऊन शेतात सिंचन केले जात आहे. मात्र गत काही दिवसांपासून इंधनाच्या किमती वाढत आहेत. याचा फटका सिंचनाला बसत आहे. भंडारा शहरात डिझेल ७८ रुपयांच्यावर पोहचले आहे. त्यामुळे डिझेल इंजिन भाड्याने घेताना शेतकºयाची दमछाक होत आहे. बैलगाडीवरील डिझेल इंजिनसाठी प्रतीतास ३०० रुपये तर ट्रॅक्टरवरील इंजिनसाठी प्रतीतास ५०० रुपये मोजावे लागते. एका तासात अर्धा एकरही ओलीत होत नाही. परंतु पीक वाचविण्याच्या धडपडीत शेतकरी ओलीत करीत आहेत. डिझेलच्या किमती वाढल्याने शेतकºयांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.