साकोली तालुक्यात चार मातांसह दीडशे बालकांचा मृत्यू
By Admin | Updated: December 3, 2014 22:43 IST2014-12-03T22:43:53+5:302014-12-03T22:43:53+5:30
माता बालक यांच्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या. मात्र तीन वर्षात चार मातासह दीडशे बालकांच्या मृत्युची नोंद आहे.

साकोली तालुक्यात चार मातांसह दीडशे बालकांचा मृत्यू
संजय साठवणे - साकोली
माता बालक यांच्या मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या. मात्र तीन वर्षात चार मातासह दीडशे बालकांच्या मृत्युची नोंद आहे.
शासनाकडून माता-बालक मृत्युचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी व ग्रामीण नागरिकांना उत्तम आरोग्य मिळावे यासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करीत आहे. शासनाचे कार्यक्रम आल्यानंतर त्याची प्रसिद्धी होत नाही. त्यामुळे योजना नागरिकापर्यंत पोहचत नाही तर याहीपेक्षा सर्वात जास्त फटका या कार्यक्रमांना बसतो तो वैद्यकीय अधिकारी व संबंधित अधिकारी मुख्यालयी गैरहजर राहण्याचा.
आरोग्य विभागातर्फे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम ही योजना व जननी शीशु सुरक्षा योजना विशेष करून गर्भवती महिला व लहान बाळांसाठी तयार करण्यात आली. या योजनात गरोदर स्त्रीयां व बाळांसाठी मोफत सेवा, नवजात आजारी बालकास तीस दिवसापर्यंत मोफत उपचार, गरोदर माता व बाळासाठी घरापासून दवाखान्यापर्यंत आणि परत घरी जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्थेसह इतरही सेवा दिल्या जातात.
चार मातांचा मृत्यू
वर्ष २०१२-१३ या दोन मातांचा मृत्यु झाला यात उर्मीला सुरेश ठाकरे (२८) रा. लवारी हिचा मृत्यु २१ नोव्हेंबर २०१२ रोजी भंडाऱ्याहून नागपूरला नेतानी वाटेत झाला तर प्रभा गोपाल शेंदरे (२६) रा. सेंदुरवाफा या मातेचा मृत्यु दि. ७ डिसेंबर २०१२ ला बाळंतपनानंतर नागपूर येथे झाला तर सण २०१४ मध्ये प्रमिला रामु मरसकोल्हे (२५) रा. खैरी या मातेचा मृत्यू दि.२९ आॅक्टोबर २०१४ रोजी भंडारा येथे झाला तर सुषमा इंद्रराज वाघाडे (२५) रा. खांबा या मातेचा मृत्यु दि.१९ आॅक्टोबर २०१४ रोजी साकोली येथील एका खाजगी दवाखान्यात बाळतपणानंतर झाला.
पाच प्राथमिक आरोग्य
केंद्र व २७ उपकेंद्र
साकोली तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला २४ तास आरोग्य सेवा मिळावी यासाठी साकोली तालुक्यात सानगडी, गोंडउमरी, विर्शी, एकोडी व खांबा या पाच ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र व २७ उपकेंद्र असून चांदोरी व वडद येथे आयुर्वेदीक दवाखाना आहे.
यासाठी एक तालुका आरोग्य अधिकारी यांचेसह अकरा वैद्यकीय अधिकारी व ३५ आरोग्य सेविका कार्यरत आहेत.
बालकांचा मृत्यू
सण २०१३-१४ या वर्षात एक दिवस ते पाच वर्षापर्यंत ८० बालकांचा व सण २०१४-१५ या वर्षात ५० बालकांचा विविध आजाराने मृत्यू झाला आहे.
माता बालकाकडे होते दुर्लक्ष
यासंदर्भात लोकमतने ग्रामीण भागातील नागरिकांशी यासंदर्भात चर्चा केली असता शासनाची योजना चांगली असली तरी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेविका यांच्याकडून मिळणारी वागणूक ही समाधानकारक नाही.