भंडारा : जिल्हा रुग्णालयात ९ जानेवारीच्या पहाटे झालेल्या अग्निकांडात १० निष्पाप बालकांचा जीव गेला. याप्रकरणी निकृष्ट दर्जाचे इन्क्युबेटर पुरवठा करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार काय? असा तारांकित प्रश्न आ. डॉ. परिणय फुके यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला.
डॉ. फुके म्हणाले, या अग्निकांडाचा ठपका ज्या दोन कंत्राटी नर्सेसवर ठेवण्यात आला, खरेच त्या नर्सेस जबाबदार होत्या का? फक्त बळीचा बकरा म्हणून काही अधिकारी व कंत्राटदारांना वाचविण्याकरिता परिचारिकांना फसविण्याचे काम करण्यात आल्याचेही फुके यांनी म्हटले आहे. ज्या संबंधित अधिकाऱ्यांमुळे अग्निशमन यंत्रणा राबविण्याची फाइल मंत्रालयाच्या टेबलावर ३ वर्षे धूळखात होती. त्या संबंधित अधिकाऱ्यांवरही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार काय, असा प्रश्नही आ. फुके यांनी उपस्थित केला आहे. याशिवाय तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक व त्यावेळी उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार करावा, अशी मागणीही विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे. यासंदर्भात या तारांकित प्रश्न याची दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंबंधी चौकशीचे आदेश दिले असल्याचे समजते.