धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:51+5:30
दुसऱ्या लॉटमधील धानखरेदी आजपासून सुरु होणार अशी शेतकऱ्यांना माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे सर्वात प्रथम नंबर लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच धान आणायला सुरुवात केली. या केंद्रावर तिरखुरी, घोडेझरी, पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, मासळ, खैरी, घरतोडा, ढोलसर आदी गावातील शेतकरी धान विक्रीकरिता आणतात.

धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना मनस्ताप
लोकमत न्यूज नेटवर्क
मासळ : येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर नियोजनाअभावी एकाचवेळी सुमारे दहा गावातील शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणले. त्यामुळे धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली असून, शेतकरी धानाच्या विक्रीसाठी पोहचले आहेत.
दुसऱ्या लॉटमधील धानखरेदी आजपासून सुरु होणार अशी शेतकऱ्यांना माहिती आधीच मिळाली होती. त्यामुळे सर्वात प्रथम नंबर लागावा, यासाठी शेतकऱ्यांनी शुक्रवारपासूनच धान आणायला सुरुवात केली. या केंद्रावर तिरखुरी, घोडेझरी, पाचगाव, पालेपेंढरी, बेलाटी, मासळ, खैरी, घरतोडा, ढोलसर आदी गावातील शेतकरी धान विक्रीकरिता आणतात. एकादिवशी ३०० ते ३५० पोती मोजमापाची क्षमता असलेल्या केंद्रावर सुमारे आठ हजार पोती धान एकाच वेळी आल्याने ट्रॅक्टर व शेतकऱ्यांची गर्दी झाली. त्यामुळे किटाळी ते विरली या रस्त्यावरची वाहतूक खोळंबली. पर्याय म्हणून समोरच असलेल्या मैदानावरुन जडवाहतूक, बसेस व दुचाकीस्वारांनी आपआपली वाहने वळवली. या मार्गावरुन लाखांदूर, वडसा, गडचिरोली अशा लांब पल्याच्या बसेस धावतात. सुमारे २०० ट्रॅक्टर धानाची पोती भरुन रस्त्यावर उभी असून या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे. शनिवारी केवळ पाच वाजेपर्यंतच खरेदी सुरु राहील असे संस्थेच्यावतीने नोटीस लावण्यात आला आहे.
योग्य नियोजनाअभावी गरजू व गरीब शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकता येत नसल्याने अनेक शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत. ज्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे ते शेतकरी वेळेपूर्वीच आपले धान केंद्रावर घेवून येतात. मात्र गरीब शेतकऱ्यांची कुचंबना होताना सध्यातरी दिसत आहे.
उशिरापर्यंत पाऊस लांबल्याने हलके व भारी धान जवळपास एकाचवेळी कापणीला आले. शेतकºयांनी मळणी करुन धान शेतातच ठेवले होते. परंतु ते सुरक्षित नव्हते. शिवाय जीवनाचा रहाटगाडगा चालविण्याकरिता आर्थिक अडचणीत शेतकरी होता. धानाच्या विक्रीशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय राहत नाही. सध्या मासळ केंद्रावर दहा हजार पोती धानाची विक्रीसाठी आवक असल्याचे दिसून येते. मासळ केंद्रावर योग्य त्या सोयीसुविधा नसल्याने शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
शेतकऱ्यांवरील संकट संपता संपेना
यावर्षी सुरूवातीपासून निसर्गाने शेतकऱ्यांना दगा दिला. सुरूवातीला पऱ्हे भरेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मात्र ऐन रोवणीच्यावेळी पाऊस बेपत्ता झाला. जवळपास एक महिना पावसाने दडी मारली. तरीही शेतकऱ्यांनी कशीबशी रोवणी आटोपली. धान जगविले. त्यानंतरमात्र समाधानकारक पाऊस पडला. परंतु ऐन कापणीच्यावेळेस पुन्हा पावसाने कहर केला. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यातूनही सावरत शेतकऱ्यांनी आपल्या धानाचा चुरना केला. धान वाळून विक्रीसाठी शासकीय धान खरेदी केंद्रावर नेले आहे. परंतु त्याठिकाणीही मोठी गर्दी होत आहे.