बेरोजगारांना फसविणारे सक्रिय
By Admin | Updated: September 12, 2016 00:36 IST2016-09-12T00:36:38+5:302016-09-12T00:36:38+5:30
नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रूपयांचा गंडा घालणारे भामटे जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाले आहेत.

बेरोजगारांना फसविणारे सक्रिय
नोकरीचे आमीष : लाखोंचा गंडा घालणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट
भंडारा : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना लाखो रूपयांचा गंडा घालणारे भामटे जिल्ह्यात पुन्हा सक्रिय झाले आहेत. या भामट्यांपासून बेरोजगार युवकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
बेकारीचा भस्मासूर दिवसेंदिवस वाढत आहे. बेरोजगारांना नोकऱ्या मिळणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. नोकरी मिळविण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार व त्यांचे पालक कितीही पैसे मोजायला तयार असतात. याचाच लाभ लाटणारे अनेक जण सध्या जिल्ह्यात सक्रिय झाले आहेत. मागीलवर्षी जिल्हा परिषदेमध्ये नोकरी लावून देतो म्हणून एका गरीब बेरोजगार युवकाजवळून एका राजकीय पक्षाशी संबधित असलेल्या एका भामट्याने पैसे घेतले होते. घरचे सोन्या-चांदीचे दागिने व अर्धा एकर शेत विकून कशीबशी त्याने रक्कम जमविली. एका महिन्याच्या आत आपल्याला नोकरीचा आदेश येणारच आहे, या आशेवर तो राहिला. एक महिना गेला, दोन महिने गेले, सहा महिने गेले. परंतु नोकरीचा आदेश त्याला आलाच नाही. त्यामुळे त्या सुशिक्षित बेरोजगाराने नोकरीची आशा सोडली व आपले पैसे परत मागण्यासाठी तो त्या भामट्याकडे गेला असता, त्या भामट्याने आपले हात वर केले.
पैसे परत न दिल्यास आपल्या घरासमोरच आत्महत्या करतो, असे म्हणताच तो भामटा पैसे परत करण्यास तयार झाला. परंतु त्याने केवळ एक लाख रुपये परत केले. उर्वरित रक्कम कोणत्याही परिस्थितीत १५ आॅगस्टपर्यंत परत करतो, असे म्हणून त्याने वेळ मारून नेली. परंतु अद्यापही त्याने रक्कम परत केले नाही. आता तो बेरोजगार युवक पोलिसात तक्रार देण्याच्या तयारीत आहे. आतापर्यत नोकरी लावून देतो म्हणून त्याने बऱ्याच जणांकडून पैसे उकळले असल्याची माहिती मिळाली. अशाच प्रकारे गेल्या महिन्यात एका भामट्याने येथील एका शाळेत नोकरी लावून देतो म्हणून एका बेरोजगार युवकाकडून सात लाख रुपये उकळले होते.
विशेष म्हणजे या शाळेत शिपायाची एकही जागा रिक्त नव्हती. याबाबत पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. सध्या अशाच बेरोजगार युवकांना हेरुन त्यांना गंडविणारी भामट्यांची टोळीच जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. यात अनेक संधीसाधूंनी रोजगारांचा बाजारच मांडल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे भामट्यांचे दलाल ठिकठिकाणी जाऊन सुशिक्षित बेरोजगारांना हेरतात. काही भामटे तर शहरातील एखादा भामटा पकडून त्याचेकडून बेरोजगारांची माहिती मिळवितात. त्याला विशिष्ट ठिकाणी घेऊन जातात. त्याला नोकरीचे आमिष दाखवून त्याचेकडून लाखो रुपये उकळतात. हे भामटे त्या सुशिक्षित बेरोजगारावर अशाप्रकारे छाप टाकतात की, तो भामट्याला पैसे देण्यास बळी पडतोच.
घरचे दागदागिने विकून, कर्ज काढून त्या भामट्यांना पैसे दिले जाते. पैसे देतांना आपण फसविले जात आहोत, याची कल्पनाही त्यांना नसते. पदवी नंतर नोकरी मिळविण्यासाठी तरुणांचा संघर्ष सुरु होतो. पदवी कोणतीही असो, नोकरी कोणत्याही क्षेत्रातील असो अर्जदार हजारावर असतात. ही स्थिती सर्वत्र दिसत आहे. जिल्ह्यात याचे प्रमाण अधिकच आहे. नोकरी नसल्याचे शल्य उराशी बाळगून सुशिक्षित तरुण नोकरीसाठी फिरतांना दिसतात. यातून नैराश्य येऊन अनेकांनी पर्यायी मार्ग स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. याचाच फायदा दलाल घेत आहे. यामुळे नोकरीचे भावही वधारले आहेत. सुशिक्षित बेरोजगारांच्या मानसिकतेचा फायदा घेत संधीसाधूंनी अनेकांकडून मोठ्या रकमा उकळलेल्या आहेत. परंतु नोकरीचा पत्ता नाही. पुढल्या महिन्यात नोकरीचा आादेश घरपोच येईल, असे सांगून हे भामटे वेळ मारुन नेत आहेत. परंतु कित्येक महिने उलटूनही नोकरी मिळत नसल्याचे पाहुन अनेकांनी या भामट्यांकडून पैसे परत करण्याचा आग्रह धरला आहे. हे भामटे पैसे परत द्यायला तयार नाहीत.
काही भामट्यांचा तर ठाव ठिकाणाही नाही. फसवणूक झालेल्या काही जणांनी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची तयारीही केली आहे. परंतु थोडे दिवस थांबा, लवकरच नोकरीचा आदेश तुम्हाला घरपोच येईल, असे सांगून हे भामटे सुशिक्षित बेरोजगारांच्या पैशावर मजा मारत आहेत. पदवीच्या प्रमाणपत्रासह लाखो रुपये देऊनही नोकरी मिळत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)
टोळीत राजकीय पदाधिकाऱ्यांचाही समावेश
या टोळीत काही पक्षाचे राजकीय पदाधिकारीसुद्धा असल्याचे एका घटनेवरून उघडकीस आले आहे. आपले आणि पक्षश्रेष्ठींचे युवकांना संबंध सांगून हे राजकीय भामटे युवकांना आपल्या जाळ्यात ओढतात व पैसे मिळताच त्यांची 'तारीख पे तारीख' सुरू होते. गेल्या वर्षी जिल्हा परिषदेत एका युवकाला लावून देतो म्हणून अशाच एका पदाधिकाऱ्याने त्याची फसवणूक केली होती.