वास्तूदोष दूर ठेवण्यासाठी घरात आवराआवर करताना स्वच्छतेचे 'हे' नियम अवश्य पाळा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 17:25 IST2021-06-22T17:19:23+5:302021-06-22T17:25:21+5:30
वास्तूमध्ये मंगल लहरी निर्माण होण्यासाठी प्रसन्न संगीत, सुगंध, फुलझाडं यांचा वापर करा. मंद स्वरात देवाचा नामजप सुरु ठेवा. त्यामुळे वातावरणात सहजता राहते.

वास्तूदोष दूर ठेवण्यासाठी घरात आवराआवर करताना स्वच्छतेचे 'हे' नियम अवश्य पाळा!
आपले घर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण सगळेच जण रोज प्रयत्न करतो. स्वच्छ घरात वातावरण प्रसन्न राहते आणि प्रसन्न वातावरणामुळे मनही प्रसन्न राहते. म्हणजेच स्वच्छतेचा परिणाम थेट आपल्या तना-मनावर होत असतो. यासाठी वास्तू शास्त्रात दिलेले पुढील नियम अवश्य पाळा. त्याचा लाभ होऊन वास्तू दोष निर्माण होणार नाहीत आणि असल्यास दूर होतील.
ब्रह्म मुहूर्तावर आणि तिन्ही सांजेला घरात केर काढू नये. हे दोन्ही मुहूर्त लक्ष्मीच्या आगमनाचे मुहूर्त मानले जातात. त्यामुळे स्वच्छता करायची असल्यास या मुहूर्ताच्या आधी किंवा नंतर केर काढावा.
घरातील कोपरे स्वच्छ ठेवावेत. विशेषतः ईशान्य, उत्तर, वायव्य या दिशांचे कोपरे स्वच्छ असावेत.
घरात कचरा टाकू नका. घर नेहमी स्वच्छ ठेवा. तसेच केराचा डबा वेळच्या वेळी धुवून स्वच्छ ठेवा.
गुरुवार सोडून आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ टाकून घराची जागा पुसा. त्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होईल. वादविवाद संपतील. तसेच लक्ष्मी घरात स्थिर राहील.
घराच्या स्वच्छतेइतकेच घरातल्या प्रसाधन गृहालाही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. जाळे, जळमट लागू देऊ नका. तसेच तिथली फरशी स्वच्छ ठेवा. वास्तू मध्ये नकारात्मकता तिथून प्रवेश करते. म्हणून तेथील स्वच्छतेला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे.
घरात फार काळ अडगड साचू देऊ नका. अडगळ साचल्यामुळे घरात वाद विवाद होतात. घरातल्या लक्ष्मीचा क्षय होतो. घरात अडगळ असणे, हे वास्तूच्या दृष्टीने घातक मानले जाते. म्हणून पेपरची रद्दी असो नाहीतर जुन्या आणि वापरात नसलेल्या तुटक्या वस्तू असोत. त्यांची वेळोवेळी विल्हेवाट लावायला शिका.
वास्तूमध्ये मंगल लहरी निर्माण होण्यासाठी प्रसन्न संगीत, सुगंध, फुलझाडं यांचा वापर करा. मंद स्वरात देवाचा नामजप सुरु ठेवा. त्यामुळे वातावरणात सहजता राहते.
घराइतकाच महत्त्वाचा आहे घराचा उंबरठा. तो रोजच्या रोज स्वच्छ करून, शक्य असल्यास सायंकाळी उंबरठ्याजवळ दिवा लावून त्याची हळद कुंकू वाहून पूजा करा. तसेच रोज सकाळी दोन बोटं रांगोळी काढा. तो लक्ष्मीच्या आगमनाचा मार्ग असल्याने तेथील स्वच्छताही महत्त्वाची आहे.
नीटनेटके आवरलेले घर जसे आपल्याला आवडते, तसे देवालाही आवडते. अशा घरात सुख, शांती, समृद्धी सदैव नांदते.