वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 11:23 IST2025-11-03T11:21:20+5:302025-11-03T11:23:59+5:30
Vaikuntha Chaturdashi 2025: वैकुंठ एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशी श्रीविष्णू आणि महादेवांचे पूजन केले जाते. जाणून घ्या...

वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
Vaikuntha Chaturdashi 2025: मराठी वर्षातील अनन्य साधारण महत्त्व असलेला चातुर्मास काळ संपला आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू झाला की, श्रीविष्णू योगनिर्देत जातात, तेव्हापासून ब्रह्मांडाचा कारभार महादेवांकडे असतो, अशी मान्यता आहे. कार्तिकी एकादशीला श्रीविष्णू योगनिर्देतून बाहेर येतात आणि पुन्हा एकदा सृष्टीची जबाबदारी घेतात, असे म्हटले जाते. कार्तिकी एकादशी झाल्यावर वैकुंठ चतुर्दशीचे व्रत केले जाते. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी श्रीविष्णू आणि महादेव यांचे पूजन केले जाते. वैकुंठ चतुर्दशीच्या व्रताबाबत जाणून घेऊया...
वैकुंठ चतुर्दशीबाबत अनेक आख्यायिका, कथा सांगितल्या जातात. यंदा, मंगळवार, ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे. या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते. भगवान शंकरांची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले. महादेवांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की, यादिवशी जे विष्णू भक्त किंवा शिव भक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील, त्यांना वैकुंठप्राप्त होईल.
वैकुंठ चतुर्दशी म्हणजे कृतज्ञता सोहळा
आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यूपश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी, असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सुकर व्हावी, म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी, म्हणून व्रत-वैकल्य करतो. वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यापैकीच एक! विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात. याबद्दल कृतज्ञता म्हणून श्रीविष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात, तर महादेव विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. हे हरीहर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो. तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी, हा वैकुंठ चर्तुदशी मागील हेतू आहे. वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरी-हर स्तोत्र म्हणतात. अन्यथा विष्णूंची सहस्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते.
वैकुंठ चतुर्दशीला व्रताचरण करण्याची सोपी पद्धत
वैकुंठ चतुर्दशीला श्रीविष्णू आणि महादेव यांच्या पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णू आणि शंकराची चौरंगावर स्थापना करावी. हरिहराचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णू आणि शंकराची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. याशिवाय, रुद्र, शिवमहिम्न स्तोत्र, शिवस्तुती यांचे पठण किंवा श्रवण करावे. यथाशक्ती ॐ नम: शिवाय तसेच श्रीविष्णूंच्या ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. काही मान्यतांनुसार, वैकुंठ चतुर्दशीच्या आदल्या रात्री श्रीविष्णू तर दुसऱ्या दिवशी सकाळी महादेव शंकाराचे पूजन केले जाते.