>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
श्रावण(Shravan 2025) ह्या नावातच अपार सौंदर्य आहे. श्रावण म्हटले की परमार्थाकडे आपल्याही नकळत मन ओढ घेते. अध्यात्माचा मनमुराद आनंद लुटण्याचा हा महिना प्रत्येकासाठी खास आहे. एखादी उपासना, ठराविक नामस्मरण हे सर्व करण्यासाठी सुरवात करायला ''श्रावण'' सुरू झाला आहे, पण तुम्ही अजून उपासनेला सुरुवात केली नाही? मग दिलेल्या पर्यायांपैकी कोणती उपासना सलग महिनाभर करता येते ते बघा.
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
महादेवाची उपासना हे श्रावणाचे खास वैशिष्ट्य. शिवामूठ वाहण्याचे आणि सोमवारच्या उपवासाचे व्रत अनेकांचे पिढ्यानपिढ्या असते . श्रावणसरी बरसत असतात आणि बाजार वेगवेगळ्या हिरव्यागार भाज्यांनी आणि फुलांनी डवरलेला असतो. हा पाऊस हवाहवासा वाटतो. वातावरणातील गारवा भक्तीची ओढ लावणारा असतो. एकंदरीत पृथ्वी वरील ह्या काळातील निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल आणि आसमंतातून होणारी वृष्टी मनाला प्रसन्न करते. हे सर्वच मंगलमय वातावरण आपल्याला नामस्मरण, पारायण, उपासनेची ओढ लावते. स्त्रिया आपले ठेवणीतील दागदागिने, वस्त्रे बाहेर काढतात आणि मंगळागौर, शुक्रवारचे व्रत, देवीची ओटी एक ना दोन सर्वात रममाण होताना दिसतात. विविध पदार्थांची सुद्धा घराघरात रेलचेल असते त्यामुळे जिभेचे चोचले सुद्धा पुरवले जातात. असा हा भक्तीची, परमार्थाची ओढ लावणारा श्रावण आयुष्यातील आनंदात भर घालतो तेव्हा जगायला उत्साह येतो , मनात नवनवीन आशा पल्लवित होतात .
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
हा आनंद द्विगुणित करण्यासाठी श्रावणात पुढील उपाय/उपासना करून बघा -
१. एका गरजू स्त्रीची ओटी भरावी. तिला कोरडा शिधा अर्थात कच्चे धान्य जे वापरता येईल ते द्यावे. २. ज्यांना शनी किंवा राहूची दशा चालू आहे त्यांनी तेलाच्या लहान बाटलीचे गरजूंना दान करावे.३. शनी कृपेसाठी एखाद्या गरजू व्यक्तीला चपला भेट द्या , छत्री द्या .४. शाळकरी गरजू मुलाला वह्या द्या, त्याच्या शिक्षणाला मदत करा .५. सर्वात श्रेष्ठ दान कुठले तर अन्न दान. गरजू व्यक्तीला भोजन द्या.६. कुठलाही दान धर्म करताना मनात परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असावी आणि कुणाला तरी मदत करण्याची संधी तू मला दिलीस म्हणून कृतज्ञता सुद्धा असावी. आपण करत असलेल्या दान धर्माचा कदापि अहंकार येऊ देऊ नये. दान हे नेहमी गुप्त असावे. वाच्यता नसावी. कारण त्याचा आपल्याही नकळत आपल्यालाच अहंकार होतो. मी हे केले आणि मी ते केले हे नकोच आहे आपल्याला. देवाने माझ्याकडून करवून घेतले, दान करायची त्याने मला बुद्धी दिली म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक व्हावे. ७. दर शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनीला वेणी गजरा आणि हळद कुंकू वाहून प्रार्थना करावी. श्रीसूक्त म्हणावे. येत नसेल तर youtube वर लावा. त्यामुळे घरातील स्पंदने , लहरी सकारात्मक होतील. मुले अभ्यासाला लागतील! करून बघा. ८. घराचा उंबरठा गोमुत्र आणि हळद ह्यांनी सारवावा. ९. रोज संध्याकाळी घराबाहेर दिवा लावावा. ऑफिस मधून यायला उशीर झाला तरी रात्री दिवा लावा पण लावा!१०. रोज संध्याकाळी तुपाचे निरांजन लावून देवांना ओवाळा, घरातील मुलांसमोर हे करावे, संस्कार आपोआप होतो. ११. शनी राहू दशा असेल तर हनुमान चालीसाला दुसरा पर्याय नाही. आपण कलियुगात आहोत , संकटांचे डोंगर आहेत, तेव्हा एकदा म्हणून चालणार नाही. सकाळी ३ वेळा आणि संध्याकाळी ३ वेळा म्हणा. स्वतः म्हणा पण त्याआधी रामाचा जप करा कारण “ जिथे राम आहे तिथे मी आहे ..” हे हनुमानाचेच वचन आहे. १२. अनेक घरात संध्याकाळी रामरक्षा म्हंटली जाते . तुमच्याकडे म्हटली जात नसेल तर म्हणायला सुरुवात करा. १३. निदान एक शुक्रवार तरी आपल्या कुलस्वामिनीला महानैवेद्य करावा. घरातील सर्वांनी तो प्रसाद घ्यावा.१४. सत्यनारायण , लघुरुद्र , पवमान अशा अनेक माध्यमातून घरोघरी देवतांचे पूजन होत असते. यथाशक्ती आपल्याही घरात या व्रतांचे आयोजन करावे. १५. माहेरवाशिणीसाठी हा खास महिना त्यामुळे नुकताच विवाह झालेल्या आपल्या मुलीना घरी बोलवून ओटी भरावी.१६. ढीगभर उपासनांचा घोळ घालण्यापेक्षा, आपल्या संपूर्ण दिवसाचे नियोजन करावे आणि ठराविक व्रते करावीत पण त्यात सातत्य ठेवावे . रोज १६ वेळा श्रीसूक्त म्हटले तर एक आवर्तन होते पण ते रोज करायला वेळ आहे का? त्याचे गणित जमणार आहे का? ह्याचा सारासार विचार करून करावे. उपासनेचा खेळ खंडोबा नको.१७. आपापल्या कुटुंबाच्या चालीरीतींचे पालन करावे . १८. श्रावण शुक्रवारी जिवती पूजन करावे. १९. आपल्या सद्गुरूंचे स्मरण तर आपल्या श्वासातच असले पाहिजे . त्यांचे दर्शन घेतले पाहिजे. गुरूलीलामृत , श्री गजानन विजय ग्रंथ , श्री साई चरित्र अशा ग्रंथांचे पारायण आवर्जून करावे.२०. श्रावण हा दानधर्म करण्याचा मास आहे. आपण नेहमी घेत असतो . देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही हेच जणू सांगण्यासाठी हा “ श्रावण मास “ येत असावा.
देवासमोर दिवा लावून शांतपणे नामस्मरण करताना बाहेर कोसळणाऱ्या श्रावण सरी मनाला अपार गोडी देतात. अशा वेळी डोळ्यातून अश्रू नाही आले तरच नवल. महाराज आपल्या भक्तांच्या हृदयात नक्कीच प्रवेश करणार हा विश्वास ठेवून तन मनाने आपले जीवन त्यांच्या चरणी समर्पित करुया , आपला संसार त्यांच्या चरणाशी अर्पण करुया आणि बघा ते आपले आयुष्य सर्वार्थाने कसे खुलवतात . अहो आपण फार साधी माणसे आहोत . साधी भाजी २५ रुपयाची ३० रुपये झाली तरी आपले महिन्याचे बजेट कोसळते इतकी साधी आहोत. म्हणूनच आपण साधीच भक्ती करुया, पण मनापासून संपूर्ण श्रद्धेने कुठलाही डामडौल देखावा न करता, कारण तीच थेट आपल्या सद्गुरूंच्या हृदयाशी पोहोचणार आहे.
उपासनेला आपल्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व आहे आणि त्याची फलश्रुती देणारा हा साजिरा श्रावण आला आहे. उपासना आपले आयुष्य घडवतात, आपल्या मनाला आधार देतात, दान धर्म आपल्याला आपल्या संकुचित बुद्धीतून मुक्त करतो. देण्याचे महत्व शिकवणारा हा श्रावण .
का होत नाही माझ्या मुलाचा विवाह ..नक्कीच होणार , नोकरी मिळणार होती त्याही पेक्षा उत्तम मिळणार , माझे शरीर निरोगी आहे आणि सगळे आजार मी दूर पळवणार ही सकारात्मक भावना देणाऱ्या आणि आपल्या आराध्याच्या समीप नेणारा हा श्रावण आपल्यातील “ मी पणाची'' कवच कुंडले टाकून देण्यासाठी तसेच उपासनेचे महत्व सांगण्यासाठी येत आहे. आपल्या घरासोबत आपले मनसुद्धा घासून पुसून लखलखीत करुय, मनातील द्वेष, राग, असूया, मत्सर, मोह, संकुचित मनोवृत्ती ह्यांना कोसो दूर करून मन श्रद्धेने आणि भक्तीरसाने भरून टाकूया. चला तर मग आपल्या आवडत्या, सहज जमणाऱ्या उपासना करुया आणि “ श्रावण सोहळा '' खर्या अर्थाने जगूया. आपल्या सर्वांकडून सद्गुरू उत्तम उपासना करून आपल्याला परमार्थाची गोडी चाखण्याची संधी देतील ह्यात शंकाच नाही.
Shravan 2025: मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग महादेवांनी का निर्माण केले? काय आहे तिथला स्थानमहिमा?
असा हा श्रावण सोहळा आपल्या सर्वांचे आयुष्य समृद्ध करुदे , परमार्थीक गोडी आणि सुख प्रदान करुदे ,आपल्या सर्व इच्छा फलद्रूप होऊदे आणि निरंतर सेवेचे व्रत आचरणात आणण्यास मदत करुदे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
संपर्क : 8104639230