Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 11:14 IST2025-06-16T11:14:27+5:302025-06-16T11:14:42+5:30
Ritual: चांगले जीवन मिळावे याकरिता आपण जशी प्रार्थना करतो, तशीच प्रार्थना मृत्यू जेव्हा केव्हा येईल तो चांगल्या पद्धतीने येवो, यासाठी ही महादेवाकडे प्रार्थना!

Ritual: अकाली मृत्यू येऊ नये म्हणून रोज झोपण्यापूर्वी करा 'ही' दोन ओळींची प्रार्थना!
सद्यस्थितीत सभोवताली घडणाऱ्या घटनांमुळे मन विषण्ण झाले आहे. अस्मानी -सुलतानी संकटं कशाला म्हणतात याचा प्रत्यय गेल्या काही दिवसांत आपल्याला आला आहे. मुंब्रा रेल्वेअपघात, अहमदाबाद विमान अपघात, केदारनाथ हेलिकॉप्टर अपघात, इंद्रायणी नदीवरील साकव पडला या दुर्घटनांमध्ये कित्येक लोक मृत्युमुखी पडले. हे आणखी किती दिवस चालणार हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे आणि मृत्यूबद्दल भीतीही आहे. अकाली मृत्यू येऊ नये ही प्रत्येकाचीच इच्छा असते. आपण चांगल्या पद्धतीने जगता यावे म्हणून जशी प्रार्थना करतो तशी पूर्वीच्या काळी लोक चांगले मरण यावे म्हणून प्रार्थना करत असत. देवाधिदेव महादेव यांच्याकडे संरक्षणाची जबाबदारी असल्याने त्यांना ही प्रार्थना करायची असते. ही प्रार्थना केवळ स्वतःपुरती नाही तर विश्वकल्याणासाठीही केली जाते. ती कशी आणि कधी करावी ते जाणून घेऊ.
घरात आणि विशेषतः मनात सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून मंत्रोच्चार केले जातात. मंत्रोच्चाराने आजारातून बरे होण्याची सकारात्मकता निर्माण होते. मानसिक आरोग्य सुधारते. मृत्यूची भीती कमी होते. अशा वेळी मन शांत करून भगवंताची उपासना करण्याबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. हा मंत्र केवळ स्वतःसाठीच नाही, तर आप्तजनांसाठी, मित्रपरिवारातील आजारी व्यक्तीसाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी प्रार्थनारूपी करता येते.
अकाली मृत्यूची भीती दूर करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र :
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥
भगवान शंकराचा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र. या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यूची भीती कमी होते आणि दुर्धर आजारही बरा होतो. त्यासाठी भक्तिभावे या जपाचे मंत्रोच्चारण करावे लागते. वरील मंत्राचा अर्थ असा आहे, की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शंकराची उपासना करतो, ते या सृष्टीचे संरक्षण करतात. आमचे जीवन समृद्ध करतात, एवढेच नाही, तर मृत्यूच्या भयापासून आम्हाला मुक्त करतात.
हा मंत्र रोगांपासून संरक्षण करतो
रोज सकाळी अंघोळ केल्यावर हा मंत्र म्हणावा. हा मंत्र सामूहिकरीत्या अर्थात कुटुंबासमवेत म्हटल्यास अधिक लाभदायक ठरतो. या मंत्राचे स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतात. कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ ग्रासले असल्यास या मंत्राचा नित्यनेमाने १०८ वेळा जप करावा.
हा मंत्र अकाली मृत्यूपासून बचाव करतो
भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यू टाळण्यास मदत होते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गंभीर आजार, अपघात किंवा अकाली मृत्यूची शक्यता असल्यास या मंत्राचा जप केल्यास हा योग टाळता येतो किंवा हा रोग झालेला असल्यास त्याच्याशी सामना करण्याचे, रोगावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते.
भीती दूर करून मनाला शांत करतो
आपल्या मनात कोणत्याही विषयाबद्दल भीती असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. दररोज १०८ वेळा या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि सर्व प्रकारची भीती दूर होते.
महामृत्युंजय मंत्र जप करण्याचे नियम
महमृत्युंजय मंत्र सोमवार किंवा प्रदोष काळी जपावा. कारण हे दोन्ही दिवस भगवान शिवांचे असून या दिवशी मंत्र जाप केल्याने विशेष फायदा होतो. जप करताना केवळ रुद्राक्षच्या जप्याने जप करावा कारण असंख्य जपाचे फळ मिळत नाही. या मंत्राचा जप करताना शिवमूर्ती, शंकराचे चित्र, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र आपल्यासोबत ठेवा. जप करताना कंटाळा करू नका, आळस देऊ नका आणि मन एकाग्र ठेवा. मंत्र जप करताना कोणाशीही बोलू नका. भक्तीने आणि श्रद्धेने या जपाचे नित्यपठण करा.
याशिवाय आणखी एक मंत्र रोज रात्री झोपताना म्हणा :
अनासायेन मरणम, विना दैन्येन जीवनम
देहान्ते तव सान्निध्यम, देही मे परमेश्वरम
अनासायेन मरणम, मला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता मरण दे, विना दैन्येन जीवनम, मला परावलंबी जीवन नको देऊ, देहान्ते तव सान्निध्यम, ज्या वेळी माझा प्राण निघेल त्यावेळी तुझे दर्शन दे, देही मे परमेश्वरम, हे परमेश्वरा मला या वरील गोष्टी दे, ही मागणी करावी.