Pitru Paksha 2023: आपण केलेल्या सेवेवर पितर संतुष्ट नाहीत, हे कसे ओळखाल? त्यावरील उपायही वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2023 15:11 IST2023-10-07T15:11:23+5:302023-10-07T15:11:50+5:30
Pitru Paksha 2023: पितृपक्षाचा शेवटचा आठवडा आला, तरी अजूनही पितरांना अर्पण केलेल्या नैवेद्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नसेल तर 'ही' असतील करणे...!

Pitru Paksha 2023: आपण केलेल्या सेवेवर पितर संतुष्ट नाहीत, हे कसे ओळखाल? त्यावरील उपायही वाचा!
येत्या सोमवार पासून पितृपक्षाचा शेवटचा आठवडा सुरू होत आहे. पितृ पक्षात तिथीनुसार आपण श्राद्धविधी केले, नैवेद्य दाखवला, तरीदेखील पितर संतुष्ट होत नसतील तर दिलेले उपाय अवश्य करा.
पितृपक्षातील पंधरा दिवसात आपले पूर्वज अर्थात पितर आपल्या वंशजांच्या भेटीसाठी पृथ्वीलोकात परत येतात अशी आपली श्रद्धा असते. आपल्या पितरांना गती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करतो. दानधर्म करतो. त्यांना नैवेद्य दाखवतो. काक स्वरूपात येऊन त्यांनी प्रसाद ग्रहण करावा असे विनवतो. मात्र तसे झाले नाही तर पितर आपल्यावर नाराज तर नाहीत ना या विचाराने साशंक होतो. याचसंदर्भात पुढील माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकेल.
>> पितृ दोष दूर होण्यासाठी पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी केले जातात. मात्र तसे करूनही पितृदोष दूर झाला नाही हे कसे ओळखावे तर? घरातील व्यक्ती सतत तणावाखाली असते. अथक प्रयत्न करूनही व्यवसायात नुकसान होते. करिअरची वाढ थांबते. वैवाहिक जीवनात संघर्ष वाढू लागतो. तरुण-तरुणींच्या विवाहात अडथळे येतात.
>> जेवणात केस येणे, दगड येणे, अन्न कुजणे ही लक्षणेदेखील पितृदोष दर्शवतात. तसेच स्वप्नात पितरांचे दर्शन घडते परंतु स्वप्नातही ते नाराज दिसतात, रडताना दिसतात. यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते आणि घरावर नैराश्य पसरते.
>> कोणतेही शुभ कार्य सुरू करायला गेल्यास अडथळे येऊ लागतात. शुभ कार्याच्या दिवशी घरात वाद, भांडण, तंटा सुरु होतो. मारामारी सुरू होते किंवा काही अशुभ घटना घडू लागतात. आनंदाचा प्रसंग दुःखात बदलतो. मुले होण्यात अडचणी येऊ लागतात.
पितृदोषावर श्राद्धकाळात करण्याचे उपाय:
अशी लक्षणे माणसाच्या जीवनात दिसू लागल्यास पितृ दोष आहे असे समजावे. अशा परिस्थितीत पितरांना लवकरात लवकर प्रसन्न करण्याचे उपाय करावेत.
>> दान करा. गोदान अर्थात गायीचे दान करा आणि ते शक्य नसेल तर गायीला नियमितपणे चारा पाणी करा.
>> पितरांच्या शांतीसाठी विधी करा.
>> कावळ्यांना तसेच गायीला अन्न दान करा.
>> भगवान शंकराचे ध्यान करताना 'ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्; मंत्राचा रोज जप करा.