सोमवती अमावास्या: ‘हा’ प्रभावी मंत्र म्हणा, अकाली मृत्यूची भीती दूर करा; पण नियमही पाळाच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 11:26 IST2024-12-29T11:19:07+5:302024-12-29T11:26:37+5:30
Margashirsha Somvati Amavasya December 2024: सोमवती अमावास्येला महादेवाच्या सर्वांत प्रभावी मंत्राचा जप करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे.

सोमवती अमावास्या: ‘हा’ प्रभावी मंत्र म्हणा, अकाली मृत्यूची भीती दूर करा; पण नियमही पाळाच!
Margashirsha Somvati Amavasya December 2024: अमावास्या तिथी सोमवारी सुरू होत असल्यामुळे या अमावास्येला सोमवती अमावास्या, असे म्हटले जाते. सोमवती अमावास्येला महादेव शिवशंकराची उपासना करणे लाभदायक असते, अशी मान्यता आहे. धर्म शास्त्रात सोमवती अमावास्येचे महत्त्व सांगण्यात विशेषत्वाने विषद करण्यात आले आहे. सोमवती अमावास्येला सूर्य आणि चंद्र ग्रह सरळ रेषेत असतात, असे सांगितले जाते. या दिवशी काही जण विशेष व्रत करतात. या दिवशी सुवासिनी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी विशेष प्रार्थना, व्रत करतात. सोमवती अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. सोमवार हा महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी विशेष मानला जातो. सोमवती अमावास्येला शंकराचे नामस्मरण, पूजन, भजन करण्याने विशेष पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.
३० डिसेंबर २०२४ रोजी मार्गशीर्ष अमावास्या आहे. सन २०२४ मधील हे शेवटचे व्रताचरण आहे. तसेच २०२४ मधील शेवटची अमावास्या आहे. या दिवशी भगवान शंकरासोबत देवी पार्वतीची पूजा केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी योग्य प्रकारे पूजा केल्याने सुख, शांती आणि समृद्धी मिळते. या दिवशी वृद्धी योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. या दिवशी महादेवांचा सर्वाधिक प्रभावी महामृत्यूंजय मंत्राचे १०८ वेळा पठण करणे लाभदायक मानले गेले आहे. या मंत्राचे महत्त्व अनन्य साधारण आहे. नियम पाळून या मंत्राचा जप केल्यास अपार पुण्य प्राप्त होऊ शकते, असे सांगितले जाते.
महामृत्युंजय मंत्राचे महत्त्व
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥
भगवान शंकराचा सर्वात शक्तिशाली मंत्र म्हणजे महामृत्युंजय मंत्र. या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यूची भीती कमी होते आणि दुर्धर आजारही बरा होतो. त्यासाठी भक्तिभावे या जपाचे मंत्रोच्चारण करावे लागते. वरील मंत्राचा अर्थ असा आहे, की आम्ही त्रिनेत्रधारी भगवान शंकराची उपासना करतो, ते या सृष्टीचे संरक्षण करतात. आमचे जीवन समृद्ध करतात, एवढेच नाही, तर मृत्यूच्या भयापासून आम्हाला मुक्त करतात.
महामृत्युंजय मंत्र अकाली मृत्यूपासून बचाव करतो
भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्र हा एक महान मंत्र आहे आणि या मंत्राचा जप केल्यास अकाली मृत्यू टाळण्यास मदत होते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गंभीर आजार, अपघात किंवा अकाली मृत्यूची शक्यता असल्यास या मंत्राचा जप केल्यास हा योग टाळता येतो किंवा हा रोग झालेला असल्यास त्याच्याशी सामना करण्याचे, रोगावर मात करण्याचे धैर्य प्राप्त होते.
महामृत्युंजय मंत्र रोगांपासून संरक्षण करतो
रोज सकाळी अंघोळ केल्यावर हा मंत्र म्हणावा. हा मंत्र सामूहिकरीत्या अर्थात कुटुंबासमवेत म्हटल्यास अधिक लाभदायक ठरतो. या मंत्राचे स्पष्ट आणि मोठ्याने उच्चारण केले असता सकारात्मक लहरी निर्माण होतात. आपणास कोणत्याही व्याधीने दीर्घकाळ ग्रासले असल्यास या मंत्राचा नित्यनेमाने १०८ वेळा जप करावा. आज सोमवती अमावस्या असल्याने आज विशेष रूपाने या मंत्राचे उच्चारण लाभदायी ठरेल. आपल्या मनात कोणत्याही विषयाबद्दल भीती असेल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. दररोज १०८ वेळा या मंत्राचा जप केल्याने मन शांत होते आणि सर्व प्रकारची भीती दूर होते.
महामृत्युंजय मंत्र जप करण्याचे नियम
महमृत्युंजय मंत्र सोमवार किंवा प्रदोष काळी जपावा. कारण हे दोन्ही दिवस भगवान शिवांचे असून या दिवशी मंत्र जाप केल्याने विशेष फायदा होतो. जप करताना केवळ रुद्राक्षच्या जपमाळेने जप करावा. या मंत्राचा जप करताना शिवमूर्ती, शंकराचे चित्र, शिवलिंग किंवा महामृत्युंजय यंत्र आपल्यासोबत ठेवा. जप करताना कंटाळा करू नका, आळस देऊ नका आणि मन एकाग्र ठेवा. मंत्र जप करताना कोणाशीही बोलू नका. भक्तीने आणि श्रद्धेने या जपाचे नित्यपठण करा.
महामृत्युंजय मंत्र अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो
घरात आणि विशेषतः मनात सकारात्मक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून मंत्रोच्चार केले जातात. मंत्रोच्चाराने आजारातून बरे होण्याची सकारात्मकता निर्माण होते. मानसिक आरोग्य सुधारते. मृत्यूची भीती कमी होते. अशा वेळी मन शांत करून भगवंताची उपासना करण्याबरोबर महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतो. हा मंत्र केवळ स्वतःसाठीच नाही, तर आप्तजनांसाठी, मित्रपरिवारातील आजारी व्यक्तीसाठी, राज्यासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी प्रार्थनारूपी करता येते.