Jyeshtha Pradosh Shivratri June 2025: ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिंपुष्टिवर्द्धनम्। उर्वारुकमिव बन्धानान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्।। मराठी वर्षातील ज्येष्ठ महिन्याची सांगता होण्यासाठी अवघे काही दिवस राहिले आहेत. सोमवार, २३ जून २०२५ रोजी अद्भूत योग जुळून आला आहे. प्रदोष आणि शिवरात्रि व्रत एकाच दिवशी आले आहेत. सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित असतो. त्यामुळे या दोन्ही व्रतांचे आणि दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे. सोम प्रदोष आणि शिवरात्रि व्रतासह अन्य कोणत्या गोष्टी केल्याने विविध प्रकारचे लाभ मिळू शकतात? जाणून घेऊया...
प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. तसेच प्रत्येक महिन्यात मासिक शिवरात्रि व्रताचे आचरण केले जाते. प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. प्रदोष आणि शिवरात्रि ही दोन्ही व्रते महादेवांना समर्पित असून, दोन व्रते एकाच दिवशी येणे शुभ संयोग मानला जात आहे. प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. सोम प्रदोष आणि शिवरात्रि या व्रतातील शिवपूजनासह काही गोष्टी आवर्जून कराव्यात, असे सांगितले जाते.
सोम प्रदोष व शिवरात्रि व्रतासह नेमके काय करावे?
- पितृदोष असल्यास पारद शिवलिंगाचे दररोज पूजन करावे, असा सल्ला दिला जातो. यासह अनेक समस्या, अडचणी दूर होऊ शकतात, असे सांगितले जाते.
- पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोष दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे. शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे. मात्र, याची स्थापना अतिशय शास्त्रशुद्ध आणि योग्य पद्धतीने करावी, असे सांगितले जाते. पारद शिवलिंगामुळे घराचे संरक्षण होण्यास मदत होते, असे म्हटले जाते.
- घरातील उत्तर-पूर्व दिशेला महादेवांचे स्थान मानले गेले आहे. या दिशेला चंदन किंवा सुवासिक चंदनासंदर्भात वस्तू ठेवल्यास उत्तम मानले जाते. शिवकृपेने घरात सकारात्मक ऊर्जा येऊ शकते, असे सांगितले जाते.
- घरात कलह किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक करणे शुभ असते. ईशान्य दिशा समस्त देवी देवतांच्या आगमनाची दिशा मानली जाते, त्यामुळे रुद्राभिषेकही त्याच दिशेला करावा. लघुरुद्र, महारुद्र किंवा अन्य कोणतेही अनुष्ठान या दिवशी इच्छित फलदायी ठरते.
- घरातील संकट दूर करण्यासाठी ईशान्य दिशेला शिव परिवाराचे चित्र लावावे. भगवान शिव, माता पार्वती, कार्तिकेय आणि गणपती यांचे चित्रे लावल्याने घरात शांततेचे वातावरण राहते. कुटुंबातील सदस्यांचे विचार शुद्ध राहतात. भगवान शंकरांचा परिवार आदर्श परिवार मानला जातो. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगण्याची प्रेरणा मिळते.
- घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर त्याच्या निवारणासाठी घराच्या पूर्व किंवा उत्तर-पश्चिम दिशेला बेलचे झाड लावावे आणि त्याला पाणी द्यावे. प्रदोष काळी म्हणजे तिन्ही सांजेला एखाद्या बेलाच्या झाडाखाली किंवा नुकत्याच लावलेल्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने घरातील वास्तुदोष संपुष्टात येतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
- यादिवशी शंकराला बिल्व पत्र वाहावे. रुद्राभिषेक सुरु असताना मनोमन ॐ नमः शिवाय हा जप करत अर्पण केलेले बिल्व दल मनातील निचरा दूर करून सन्मार्गास प्रवृत्त करते, असे सांगितले जाते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.