Guru purnima 2021 : तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 14:38 IST2021-07-22T14:38:28+5:302021-07-22T14:38:51+5:30
Guru purnima 2021: गुरुभेटीही आस, तळमळ लागल्याशिवाय गुरु भेटत नाहीत. आपण योग्य शिष्य बनलो की गुरु आपणहून आपल्या भेटीस येतात.

Guru purnima 2021 : तळमळ लागल्यावर गुरुभेट निश्चित- ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
काय करावे हे मनुष्याला कळते, पण त्याचे मन त्याला आवरत नाही. विषयाचा उपभोग घेताना आपले मन त्यात रंगून जाते आणि त्याचे सुखदु:ख निस्तरताना मात्र आपली भ्रमिष्टासारखी चित्तवृत्ती होते. आपल्याला झालेला भ्रम नाहीसा करायला तीन गोष्टी आवश्यक आहेत.
१. सद्विचार
२. नामस्मरण
३. सत्संगति
संत ओळखणे फार कठीण आहे. आपण त्यांच्यासारखे होऊ लागलो की मगच त्यांचा परिचय होऊ लागतो. त्यापेक्षा सद्विचार बाळगणे सोपे. भगवंताचा विचार तोच सुविचार होय. भगवंताच्या कथा ऐकाव्यात, त्याच्या लीला वर्णन कराव्यात, त्याच्या वर्णनाचे ग्रंथ वाचावेत, पण याहीपेक्षा आपल्याजवळ नेहमी राहणारे असे त्याचे नाम घ्यावे.
तुम्ही नेहमी नाम घेत गेलात, तर तुम्हाला संत धुंडीत राहण्याची गरज न पडता, संतच अगदी हिमालयातले संत, तुम्हाला धुंडीत येऊन तुमचे काम करतील. अहो, खडीसाखर ठेवली की मुंगळ्यांना आमंत्रण करायला नको.
तुम्ही म्हणाल, 'आम्हाहा ते करता येत नाही. पण आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो आणि तो न शिकला किंवा त्याला अभ्यास येत नसला, तर पुन्हा त्याच वर्गात त्याला बळजबरीने ठेवतोच की नाही? त्याला एक विद्या आली नाही, तरी दुसरी कोणती येईल ती शिकवतोच की नाही? आणि त्याने आपल्या पोटापाण्याची व्यवस्था करायला तयार व्हावे म्हणून आपल्याला तळमळ लागली आहे का? तशी तळमळ लागली म्हणजे तुमचा गुरु प्रत्यक्ष जमिनीतून वर येईल. तो सारखा तुमच्याकरीता वाट पाहत असतो.
आई मुलाची फार तर एक जन्मापर्यंतच, म्हणजे देह आहे तोपर्यंतच काळजी करेल. पण गुरु हा जन्मोजन्मी तुमची काळजी घ्यायला तयार आहे. त्याला देह नसला तरी तो नाही असे समजू नका. देहाचे भोग येतील-जातील, पण तुम्ही सदा आनंदात राहा. तुम्हाला आता काही करणे उरले आहे असे मानू नका. गुरुभेट झाली, म्हणजे तुम्हीपणाने उरतच नाही. मात्र, गुरुला अनन्य शरण जा.
एक शिष्य मला भेटला, तेव्हा तो आनंदाने नाचू लागला. मी त्याला विचारले, `तुला एवढा आनंद कसला झाला आहे?'
त्यावर तो म्हणाला, `मला आता आनंदाशिवाय काही उरलेच नाही, कारण आज मला गुरु भेटले.'
जो असा झाला, त्यालाच खरी गुरुची भेट झाली. तरी तुम्ही गुरुला अनन्य शरण जा, म्हणजे तुम्ही आणखी काही करण्याची जरुरी नाही.