Gudi Padva 2024: नवीन वर्षाचा नवीन संकल्प करा; सुख, समृद्धी, सुदृढ आरोग्य मिळवा; सविस्तर वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 01:17 PM2024-04-05T13:17:47+5:302024-04-05T13:18:25+5:30

Gudi Padva 2024: येत्या मंगळवारी अर्थात ९ मार्च रोजी गुढी पाडवा आहे, आपले नववर्ष सुरु होत असून इंग्रजी नववर्षाच्या निमित्ताने राहिलेले संकल्प आता सिद्धीस नेता येतील!

Gudi Padva 2024: Make a New Year's New Resolution; Get happiness, prosperity, good health; Read in detail! | Gudi Padva 2024: नवीन वर्षाचा नवीन संकल्प करा; सुख, समृद्धी, सुदृढ आरोग्य मिळवा; सविस्तर वाचा!

Gudi Padva 2024: नवीन वर्षाचा नवीन संकल्प करा; सुख, समृद्धी, सुदृढ आरोग्य मिळवा; सविस्तर वाचा!

'सत्य संकल्पाचा दाता नारायण' अर्थात जे संकल्प प्रामाणिक हेतूने केले जातात ते सिद्धीस नेण्यासाठी खुद्द नारायण आपली मदत करतो. दर दिवशी आपण काही ना काही संकल्प करत असतो, परंतु काही औचित्याने केलेले संकल्प पूर्ण करण्याची आपली जिद्द असते. विशेषतः नववर्षाच्या निमित्ताने संकल्प करण्याची हुक्की येते. मात्र त्यात सातत्य टिकून न राहिल्याने संकल्प बारगळतात आणि नव्याचे नऊ दिवस म्हणत ते बाद होतात. २०२४ या इंग्रजी वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याही बाबतीत असेच झाले असेल तर आता हिंदू नववर्षाच्या निमित्ताने पुनश्च हरी ओम करता येईल. अशा वेळी सर्वात पहिला संकल्प करायचा तो म्हणजे निरोगी आयुष्याचा! त्यासाठी करूया २१ दिवसांचा संकल्प...त्याबद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे!

सूर्योदयाच्या दोन तास आधीची वेळ म्हणजे साधारण पहाटे ४.३० ते ६.३० ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते. त्या काळात उठून इतर कोणतीही कामे न करता स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला, तर त्याचा दसपटीने अधिक प्रभाव पडतो आणि फायदा होतो. 

'लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे' असे धर्म शास्त्रात म्हटले आहे. परंतु ब्रह्म मुहूर्त दूरच आपण सूर्योदयाच्या वेळीदेखील उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येते. त्या कालावधीत दिवसभराच्या तुलनेत कमी विचार असतात. त्यामुळे मन शांत होण्यास, एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्याबद्दल जी तयारी करायची आहे, त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो. सकाळच्या वेळी केलेले पाठांतर, वाचन दीर्घकाळ लक्षात राहते. स्मरण शक्ती वाढते. सकारात्मकता वाढते. 

पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत. रात्री वातावरणात रज-तम गुणांचे, म्हणजे त्रासदायक वाटण्याचे प्रमाण अधिक असते, तर पहाटे वातावरण सात्त्विक, म्हणजे आनंददायक असते. सकाळचे वातावरणही शुद्ध आणि पवित्र, तसेच शांत आणि थंड असते. या काळात केलेला नामजप भावपूर्ण होतो, तसेच अभ्यासही चांगला होतो. म्हणून साधकाने ब्रह्म मुहूर्तावर साधना करावी असे सांगितले जाते. आजही योग शिबिरांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठवले जाते. तसेच गायक ब्रह्म मुहूर्तावर उठून रियाज करतात. विद्यार्थी पहाटे उठून अभ्यास करतात. रात्री जागरण करून केलेल्या अभ्यासापेक्षा पहाटे उठून केलेला अभ्यास गुणवत्ता वाढवतो. 

पशु, पक्षी, निसर्गदेखील ब्रह्म मुहूर्तावर जागृत होतो. मनुष्यानेदेखील ब्रह्म मुहूर्तावर उठून आपली दिनचर्या सुरू केली, तर त्याला दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य तर प्राप्त होईलच, शिवाय ताणतणाव, नैराश्य, नकारात्मक विचार यापासून कायमची सुटका मिळेल. विश्वास बसत नसेल, तर किमान २१ दिवस ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा सराव करून पहा...!

 

Web Title: Gudi Padva 2024: Make a New Year's New Resolution; Get happiness, prosperity, good health; Read in detail!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.