Ganesh Utsva 2022: हरितालिकेचा आदला दिवस 'आवरणं' हा सण साजरा करतात; खाऊ, गप्पा, गाणी नुसती धमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 01:08 PM2022-08-27T13:08:28+5:302022-08-27T13:09:04+5:30

Hartalika Teej 2022: संस्कृती, प्रथा, परंपरा यांच्या नियमावलीतही किती धमाल होती, हे जाणून घेण्यासाठी त्यांचा उद्देश पूर्णतः समजून घ्यायला हवा ना!

Ganesh Utsva 2022: The day before Harithalike celebrates the festival of 'Avarana'; Food, gossips, songs just fun! | Ganesh Utsva 2022: हरितालिकेचा आदला दिवस 'आवरणं' हा सण साजरा करतात; खाऊ, गप्पा, गाणी नुसती धमाल!

Ganesh Utsva 2022: हरितालिकेचा आदला दिवस 'आवरणं' हा सण साजरा करतात; खाऊ, गप्पा, गाणी नुसती धमाल!

googlenewsNext

>> रवींद्र वासुदेव गाडगीळ 

आवरणे यालाच 'आवरणं' असेही म्हणतात. वास्तविक पाहता हे एक घरातल्या, दारातल्या स्त्रियांचे आवडते काम. मात्र भाद्रपद शुध्द पक्ष तृतीयेला स्त्रिया "हरतालिका" हे व्रत करतात. त्याच्या पूर्वसंध्येला गौरीगणपतीची व  हरतालीकेची जी तयारी केली जाते ती म्हणजे आवरणे! यंदा ३० ऑगस्ट रोजी हरितालिका आहे तर त्याच्या आदला दिवस म्हणजे सोमवार २९ ऑगस्ट यादिवशी आवरणं केले जाईल. आवरणं या शब्दाचा अर्थ किती पद्धतींनी घेता येतो ते बघा... 

श्रावण-भाद्रपदात वनश्री हिरव्यागार शालूने नटलेली,सुजलाम,सुफलाम झालेली असते. म्हणून निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी गावाबाहेरच्या वनात, परीसरात, बागेत जाऊन ताजी फुले, फळे, पत्री (सोळा पत्री-बेल, तुळशी, दूर्वा, प्राजक्त, आघाडा, माका, धोतरा, केवडा, मोगरा, शेवंती,चाफा, सब्जा, आवळी, केळी, अशोक, कण्हेरी, जास्वंद, गुलबक्षी, कमळ, कदंब, ब्राम्ही, आंबा, सिताफळ, रामफळ) गोळा करण्यासाठी जातात. तेही एकट्याने नाही, तर जवळपासच्या, चाळीतल्या, ओळखीच्या, महिला मंडळातल्या, किटी-भिशी पार्टिच्या, क्लबच्या मैत्रीणींना बरोबर घेऊन जातात. सोबत स्वतः केलेले विविध पदार्थ, जसे की थालिपीठ, तीखट पुऱ्या ,बटाटा भाजी, मसालेभात, मटकी, मटार उसळ, शिरा, पुरणपोळी, कटलेट, श्रीखंड, आळूवडी, कोंथिबीर वडी,लाडू, चिवडा, शंकरपाळे, फरसाण, इ. जेवणाचे, नाश्त्याचे,आपापल्या सवडीप्रमाणे, कुवतीनुसार बनवलेले अनेक पदार्थ  भरपूर प्रमाणात नेतात. कारण दुसऱ्या दिवशी कडक उपास असतो ना!!

खूप नाचगाणी, खेळ, भेंड्या, स्पर्धा,झाल्या की गोलाकार बसून सहभोजन होते. असे भोजन आवळी नवमीलाही होते. यात अनेक रेसिपीची देवाणघेवाण, थट्टामस्करी, गॉसिप, एकमेकींना सहाय्य, सल्ला, सुखदुःखाची देवाणघेवाण, समस्या, प्रश्नोत्तरे होतात. कलागुणांना वाव मिळतो,संधी मिळते, ओळखी होतात. एक प्रकारचे स्नेहसंमेलनच असते ते. तेथील हिरवळ डोळ्यांना शितलता देते. मोकळ्या हवेत फिरल्याने प्राणवायू मिळून उत्साह, आनंदाचा साठा वर्षभरासाठी मिळतो. लग्नासाठी उपवर वधूचे संशोधन संपते. नवीन नाती, मैत्री जुळतात. औषधी वृक्षवेलींची ओळख होऊन उपयोग समजतो. आजीच्या बटव्यातील स्वस्तातील आयुर्वेदिक स्वदेशी औषधे कळतात. ज्यामुळे तात्कालिक, प्राथमिक उपचाराला चालना मिळते. 

वनजीवनाशी जवळीक होते.विविध प्राणीपक्षी, कीटक, माणसे, त्यांचे राहणीमान, गरजा, निसर्ग यांचा जवळून अभ्यास होतो. आणि या सगळ्यात एक दिवस विश्रांतीचा, श्रमपरीहाराचा आणि आजच्या भाषेत "चूल, (रांधा वाढा उष्टी काढा), मूल (एक स्वतःचे,एक सासूचे) व फूल (टेरेस गार्डन)" यातून एक 'स्वतःची स्पेस' मिळण्याकरता होतो.

दुसरे "आवरणे" म्हणजे गौरीगणपतीची पूर्वतयारी. झाडझूड, साफसूफ.  "स्वच्छता का ईरादा कर लिया मैने" तो तसा वर्षभर असतो. गृहिणीला आवराआवर फारच प्रिय.  प्रत्येक वस्तू जागच्या जागीच हवी, नाहीतर घर डोक्यावर घेते. पूर्वी घरच्यांनी पसारा करायचा आणि बाईने आवरायचा. मात्र आता नाही, जगातला कोणत्याही उच्चपदस्थ नेत्याची, नवऱ्याची टाप नाही, की तो ती जमीन पुसत असतांना ओलांडून जाईल, मग भले तो ऑफिसात बॉस असेल, पण इथे बास.

त्यामुळे तोही आता आवराआवर करण्यात मदत करतो. मोठमोठाली आजेसासुंकडून ठेवा म्हणून मिळालेली पारंपरिक भांडी, क्रोकरी, पडदे, चादरी, मंडपी, सजावट, तोरणे, लायटिंग, गौरीचे मुखवटे, समया, उपकरणी, महिरप न सांगता माळ्यावरून काढून देतो. मग ती सुद्धा निगुतीने सगळी तयारी करून सज्ज होते.

तिसरे "आवरणे" म्हणजे आपल्या षडविकारांना आवरणे. ज्यामुळे आपले वर्षभरात शारीरिक, मानसिक, आर्थिक, न भरून निघणारे नुकसान झालेले असते. नातेवाईक दुरावतात. गैरसमज होतात. स्वतः पुढाकार घेऊन ते मिटवायचे. कारण नात्यात पडलेली एक "हेअर क्रॅक" पुढे वाढत जाऊन "दरी व दुरी" बनते. आयुष्य थांबते. ती दूरी मिटवून राग आवरता घ्यायचा. 

अनावश्यक खरेदी बंद. संग्रहणी रोग तो, चांगला नाही. नको असलेल्या गोष्टी गरजूंना वेळेवर व सुस्थितीत असतांना देणे, वेळ-पैसा-मनुष्यबळ- श्रम-धान्य, माणुसकी, संस्कार, संस्कृती यांची बचत व जोपासना करणे. घरातली अडगळ दूर करणे, ज्यामुळे निगेटिव्हिटी वाढते, उदासी, वैराग्य, येते. काम करण्याचा उत्साह निघून जातो.

चौथे "आवरण" म्हणजे झाकण. घडून गेलेल्या गोष्टी नजरेआड करणे,चुकला असेल तर समजावून पुन्हा संधी देणे. अर्थात "बबड्या" डबड्या होईल, ईतकेही नाही. सत्य असल्या तरी त्या प्रगट केल्याने वैचारिक गोंधळ, बजबजपुरी माजेल म्हणून हाताची घडी, तोंडावर बोट. झाकली मूठ सव्वा लाखाची.
असो, मी सुद्धा "आवरतं" घेतो. हरतालिकेच्या व गौरीगणपतीच्या शुभेच्छा.

Web Title: Ganesh Utsva 2022: The day before Harithalike celebrates the festival of 'Avarana'; Food, gossips, songs just fun!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.