आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांच्या आयुष्याशी करू नका-गौर गोपालदास प्रभू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 16:38 IST2021-08-06T16:38:20+5:302021-08-06T16:38:47+5:30
प्रत्येकाची परिस्थिती, काळ, वेळ, वय, समस्या वेगवेगळ्या असतात. या सर्वाचा विचार करून पाहिले, तर प्रत्येक जण आपापल्या जागी योग्यच आहे.

आपल्या आयुष्याची तुलना दुसऱ्यांच्या आयुष्याशी करू नका-गौर गोपालदास प्रभू
आपल्या दु:खाचे मूळ कारण आहे तुलना. आपण जोपर्यंत तुलना करणे थांबवणार नाही, तोवर आपण सुखी समाधानी होणार नाही. आईने आपल्याला व आपल्या धाकट्या भावाला खाऊ दिला, तर माझ्यापेक्षा त्याला जास्त का दिला याचा विचार करण्यात आपण खाऊ खाण्यातली मजा गमावून बसतो. तीच सवय अंगवळणी पडते आणि कायमस्वरूपी राहते. पण ही तुलना थांबवा, तुलना कधीही न संपणारी असते पण ती करण्यात आनंद संपून जातो हे लक्षात ठेवा.
समजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब ताशी अनुक्रमे ८ आणि १० किलोमीटर धावतात, तर त्यांच्यात वेगवान कोण? तुम्ही उत्तर द्याल - ब
समजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब चे वय अनुक्रमे ४० आणि २० आहे, तर त्यांच्यात जास्त निरोगी कोण? तुम्ही उत्तर द्याल - अ
समजा तुम्हाला सांगितले, अ आणि ब यांच्यात अ निरोगी आहे पण ब ला दुर्धर आजार आहे, तरीही तो धावतोय, त्यांच्यात विजेता कोण? तुम्ही उत्तर द्याल - ब
याचाच अर्थ, प्रत्येकाची परिस्थिती, काळ, वेळ, वय, समस्या वेगवेगळ्या असतात. या सर्वाचा विचार करून पाहिले, तर प्रत्येक जण आपापल्या जागी योग्यच आहे. आपण करत असलेली तुलनाच अयोग्य आहे.
प्रत्येकाच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका वेगवेगळी आहे, त्यामुळे साहजिकच उत्तरपत्रिकाही वेगवेगळी आहे. चुकूनही दुसऱ्याचे उत्तर कॉपी करायला जाऊ नका, त्याच्यासाठी ते बरोबर असेलही, पण तुमच्यासाठी ते चुकीचे ठरू शकते. शालेय गणितात शिकवलेली सूत्रे नियम पाठ्यपुस्तकातील गणिते सोडवू शकतील, परंतु आयुष्याचे गणित सोडवायचे असेल, तर एकच फॉर्म्युला सगळीकडे वापरून चालणार नाही. तो व्यक्तीपत्वे बदलत जाईल.
प्रत्येकाला भगवंताने एकमेवाद्वितीय बनवले आहे. कोणीही कोणासारखा नाही. कोणी नशिबाने मोठा होतो तर कोणी प्रयत्नाने. मात्र जो तुलना करत बसतो, तो कधीच मोठा होऊ शकत नाही. म्हणून तुलना करणे थांबवा आणि आयुष्याचा आनंद घेत समाधानाने जगायला शिका.