श्री रामदूताचा चमत्कार! २१ दिवस श्रद्धेने करा 'हा' उपाय आणि अनुभवा आयुष्यात सकारात्मक बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:44 IST2026-02-21T15:43:22+5:302026-02-21T15:44:23+5:30
संकटमोचक हनुमान: झोपेतून उठल्यावर घ्या ही १२ नावे, २१ दिवसांत अनुभवाल सकारात्मक बदल; सूरवात कधी करावी तेही जाणून घ्या.

श्री रामदूताचा चमत्कार! २१ दिवस श्रद्धेने करा 'हा' उपाय आणि अनुभवा आयुष्यात सकारात्मक बदल
हनुमान हे कलियुगातील जागृत दैवत मानले जातात. संकटाच्या वेळी ज्यांचे नाव घेताच भीती पळून जाते, अशा महाबलाढ्य हनुमंताच्या १२ नामांचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. ती बारा नावे कोणती? त्यामुळे कोणता लाभ होतो आणि ते किती दिवस घ्यायला हवे ते जाणून घेऊ.
आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. अशा वेळी गरज असते ती एका दैवी शक्तीच्या आधाराची. प्रभू श्रीरामाचे परम भक्त आणि अष्टसिद्धी-नवनिधीचे दाते 'हनुमान' यांच्या नामात इतकी शक्ती आहे की, केवळ स्मरण केल्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात.
आनंद रामायणात नमूद केल्यानुसार, हनुमंताची १२ नावे सकाळी उठल्यावर घेण्याने सर्व संकटांतून मुक्ती मिळते.
हनुमंताची १२ प्रभावशाली नावे:
१. श्री हनुमते नमः (ज्याचे हनुवटी कापली गेली आहे असे)
२. श्री अंजनिसुताय नमः (माता अंजनीचा पुत्र)
३. श्री वायुपुत्राय नमः (पवनपुत्र)
४. श्री महाबलाय नमः (अफाट शक्तीचा स्वामी)
५. श्री रामेष्टाय नमः (प्रभू रामाचा प्रिय भक्त)
६. श्री फाल्गुण सखाये नमः (अर्जुनाचा मित्र)
७. श्री पिंगाक्षे नमः (ज्याचे डोळे सोनेरी-तांबूस आहेत)
८. श्री अमितविक्रमे नमः (असीम पराक्रम गाजवणारा)
९. श्री उदधि क्रमणे नमः (समुद्र ओलांडणारा)
१०. श्री सीता शोक विनाशने नमः (माता सीतेचे दुःख दूर करणारा)
११. श्री लक्ष्मण प्राणदात्रे नमः (लक्ष्मणाचे प्राण वाचवणारा)
१२. श्री दशग्रीव दर्पहा नमः (रावणाचा अहंकार चक्काचूर करणारा)
२१ दिवसांचा संकल्प आणि त्याचे लाभ:
शास्त्रानुसार, जो कोणी रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी या १२ नामांचे स्मरण करतो, त्याला खालील फळे प्राप्त होतात:
भयमुक्ती: मनातील भीती, भीतीदायक स्वप्ने आणि अज्ञात भीती दूर होते.
कार्यात यश: अडकलेली कामे मार्गी लागतात आणि बुद्धी तल्लख होते.
शारीरिक व्याधी: आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते.
संकट निवारण: प्रवासात किंवा कोणत्याही कठीण प्रसंगात ही नावे कवच म्हणून काम करतात.
कसा करावा हा संकल्प?
रोज सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर, पाय जमिनीला टेकवण्यापूर्वी शांत मनाने ही १२ नावे म्हणावीत. हा संकल्प सलग २१ दिवस श्रद्धेने करा. श्रद्धेमध्ये डोंगर हलवण्याची शक्ती असते, आणि जिथे भक्ती असते तिथे हनुमान स्वतः रक्षणासाठी उभे राहतात. त्यामुळे शुभ क्षणाची वाट न पाहता हे शुभ कार्य त्वरित सुरु करा.