आरणवाडी तलावाचा सांडवा फोडताना सर्वच पुढारी मूग गिळून गप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:35 IST2021-07-28T04:35:36+5:302021-07-28T04:35:36+5:30
अनिल महाजन धारूर : धारूर तालुक्यात तब्बल सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झालेला आरणवाडी तलाव पहिल्याच वर्षी चांगल्या पावसाने दीड ...

आरणवाडी तलावाचा सांडवा फोडताना सर्वच पुढारी मूग गिळून गप्प
अनिल महाजन
धारूर
: धारूर तालुक्यात तब्बल सतरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पूर्ण झालेला आरणवाडी तलाव पहिल्याच वर्षी चांगल्या पावसाने दीड महिन्यातच तुडुंब भरला. या तलावामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले होते. मात्र, नियमबाह्यपणे कुठेही तसे नमूद नसताना लघु पाटबंधारे विभागाने दोन महिन्यांपूर्वी केलेला सांडवा चक्क फोडून लाखो लिटर पाणी नदीपात्रात सोडले.
या भागातील चार ते पाच गावचे नागरिक फोडण्याला कडाडून विरोध करीत होते. दोन दिवस तो फोडू दिला नाही. मात्र, लोकप्रतिनिधी व राजकारण्यांनी अधिकारशाहीपुढे नांगी टाकल्याने अधिकाऱ्यांनी एक होऊन कायद्याचा बडगा दाखवीत पहिल्याच वर्षी सांडवा फोडला. यावर एकाही राजकारण्याने ब्र शब्दही काढला नाही. याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या तलावामुळे आरणवाडी, चोरांबा, पहाडीपारगाव, थेटेगव्हाण, ढगेवाडी येथील डोंगराळ भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली होऊन डोंगरपट्ट्यात हरितक्रांती होणार होती. या परिसरातील शेतकरी हा तलाव पूर्ण झाल्यावर आनंदी होता.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पर्यायी रस्त्याचे काम अर्धवट केल्याने त्यांनी रस्ता सुरक्षिततेच्या नावाखाली २० जुलैला पाटबंधारे विभागाला पत्र दिले व तलावात ८० ते ८५ टक्के पाणी ठेवण्यास सांगितले होते. या तलावाखालील गावांनी विरोध केला, तर महसूल, पोलीस, पाटबंधारे सर्व विभागाने एक होऊन कायद्याचा बडगा उगारला. कारवाईचा इशारा दिला. सर्व यंत्रणेचा वापर केल्याने कोणाचेच पाठबळ आंदोलनास न मिळाल्याने अधिकारशाहीचा विजय झाला आणि सांडवा फोडला.
या भागातील एकाही लोकप्रतिनिधीने या गंभीर प्रश्नावर चकार शब्दही काढला नाही. एक प्रकारे अधिकाऱ्यांची पाठराखण करण्याचे काम केले. पाच गावचे ग्रामस्थ आंदोलन करीत असताना साधे तलावाकडे फिरकले नाहीत. याबाबत त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता प्रमुख नेते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र, या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी होऊन या दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे.
गुन्हे दाखल करा
दोन महिन्यांपूर्वी या साठवण तलावाचा सांडवा केला व कुठलाही नियम नसताना स्वतःचे निकृष्ट काम लपविण्यासाठी नियमबाह्यपणे सांडवा फोडण्यात आला. याप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत.
- सादेक इनामदार, सामाजिक कार्यकर्ते
गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे
पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे गैरकृत्य झाकण्यासाठी नियमबाह्यपणे सांडवा फोडून लाखो लिटर पाणी वाया घालविले. या भागातील लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी जनतेचा जिव्हाळ्याचा प्रश्न लक्षात घेऊन याकडे लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
-विजय शिनगारे, जलदूत
270721\img_20210725_115330_14.jpg