दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार? मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालक संभ्रमात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:33+5:302021-07-24T04:20:33+5:30
बीड : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दाखले काढण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र दाखल्यावर परीक्षेचा तारीख कुठली ...

दहावीच्या दाखल्यांवर शेरा काय असणार? मुख्याध्यापकांसह विद्यार्थी-पालक संभ्रमात!
बीड : दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दाखले काढण्यासाठी पालक-विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र दाखल्यावर परीक्षेचा तारीख कुठली आणि शेरा काय द्यायचा, याबाबत अद्यापपर्यंत कुठल्याच सूचना नसल्याने मुख्याध्यापकांमध्ये सध्या संभ्रम आहे. तर दाखल्यावर शाळा सोडण्याचे कारण म्हणून कोणता शेरा येणार, याबाबत पालक आणि विद्यार्थीदेखील प्रतीक्षा करीत आहेत. परीक्षेच्या तारखेचा व निकालाचा महिना मार्च, एप्रिल, मे की जून याबाबत जवळपास सात हजार मुख्याध्यापकांनी परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन मागितले होते. दाखला देताना विद्यार्थ्याचे नाव, आसन क्रमांक, परीक्षेचा महिना याबाबत मंडळाचे परिपत्रक येईपर्यंत अनिश्चितता आहे. दोन- तीन दिवसांत ती दूर होईल, अशी आशा शाळांच्या मुख्याध्यापकांना आहे.
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा -
दहावीतील एकूण विद्यार्थी -४०५४०
पास झालेले विद्यार्थी - ४०५२२
मुख्याध्यापक म्हणतात -
नववी आणि दहावीचे मूल्यमापन करून लागलेला निकाल व्यवस्थित व समाधानकारक आहे. प्रतिकूल परिस्थितीत शासनाने चांगला व योग्य निर्णय घेतला. बोर्डाकडून उपलब्ध झाल्यानंतर गुणपत्रिका व दाखला देण्यात येणार आहे. ही कागदपत्रे देताना कुठलीही अडचण येणार नाही.
- दिगंबर अंकुशे, मुख्याध्यापक, द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड.
------------
दाखला देण्याबाबत किंवा शेरा लिहिण्याबाबत कोणताही संभ्रम नाही. ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यानंतर ८-१० दिवसांत बोर्डाकडून गुणपत्रक येतील, त्यानंतर दाखले दिले जातात. दाखल्यावर निकालाचा शेरा उल्लेखाबाबत अडचण येणार नाही. - राजकुमार कदम, उपमुख्याध्यापक, श्री. शिवाजी विद्यालय, बीड.
------------
पालक म्हणतात...
कोरोनामुळे नववी आणि दहावीचे मूल्यांकन करून निकाल लागला आहे, तो योग्य वाटतो. पुढील शिक्षणासाठी शाळा सोडताना लागणाऱ्या दाखल्याबाबत पालक म्हणून कोणतीही शंका नाही. शासन व शाळा विद्यार्थ्याचे हित पाहूनच योग्य निर्णय घेतील. - शिवाजी सोनके, पालक, बीड.
--------
कोरोनाच्या परिस्थितीमुळे दहावी परीक्षेची मूल्यांकन पध्दत व निकाल योग्य राहिला. परंतु नेहमीप्रमाणे परीक्षा न झाल्याने विद्यार्थ्यांची काठिण्यपातळी सिद्ध होऊ शकली नाही. निकाल लागल्याने दाखला मिळणारच आहे. त्याबाबत पालक म्हणून कोणताही संभ्रम नाही. - अशोक हावळे, पालक, बीड.
------
अडचण येणार नाही
इयत्ता दहावीचा निकाल शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार मूल्यांकन करून लागला आहे. शाळा सोडताना दाखल्यावर शेरा काय लिहावा याबाबत बोर्डाकडून मार्गदर्शन होईल. त्यामुळे कोणत्याही शाळेला अथवा विद्यार्थ्याला अडचण येणार नाही. - डॉ. विक्रम सारूक, शिक्षणाधिकारी (मा.) बीड.
-------------